Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
मुंबई–पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने आणि वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई–पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने आणि वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “देशात दोन जणांचे बिंग फुटले आहे. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि दुसरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. मिसिंग लिंक प्रकल्पावर पडलेली दरड म्हणजे ६७०० कोटी रुपयांचा प्रकल्प एका झटक्यात वाहून गेल्याचे उदाहरण आहे. मात्र, कमिशन आणि दलाली मात्र वाहून गेली नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राऊत यांनी पुढे राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केले. मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांतील पावसामुळे उघड झालेल्या समस्यांचा उल्लेख करत त्यांनी ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप केला. तसेच, सत्ताधाऱ्यांनी विकासकामांपेक्षा कमिशनखोरीला प्राधान्य दिल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला.
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरही संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी संबंधित प्रकल्पांमध्ये पारदर्शकता राखण्याची मागणी केली. तसेच, लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने अधिक जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी म्हटले. मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच दरड कोसळल्याने प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग, रेल्वे वाहतूक आणि इतर दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर मिसिंग लिंक प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिकच तीव्र झाले आहे.