Sanjay Raut Press : महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सडके बटाटे; राऊतांची खरमरीत टीका
Sanjay Raut Slams Mahayuti : खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सडकी बटाटे भरली आहेत. शनिवारच्या विजयी मेळाव्यानंतर ते गोंधळले आहेत. आता त्यांना रडावेच लागेल. त्यांचा रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू करा, आम्ही तुमचे कार्यक्रम लावू, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असून, त्यांच्याकडून विचित्र विधाने येत आहेत, असा हल्ला शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, वरळी डोम येथील विजयी मेळाव्यानंतर देशभरात हिंदी सक्तीविरोधात वातावरण तयार झाले. अनेक राज्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केले. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याने केंद्राच्या हिंदी सक्तीविरोधात लढण्याचे बळ मिळाल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे, महाराष्ट्राला मुंबईत एकटे पाडल्याचे दिसून आले. ठाकरे यांना काय बोलावे हे सांगण्याची गरज नाही. ठाकरे कुटुंबाला लेखणी आणि वाणीची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रावर आपले साम्राज्य निर्माण केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवर टीका करताना राऊत म्हणाले, शिंदे आता वडे, भजी, कांदा पोहे खात नाहीत, ते ढोकळा खातात. त्यांच्या नातवाला देखील ढोकळा खाऊ घालतात. त्यांची दाढी नकली आहे, ती महाराजांची नाही. अमित शहा ती कधीही कापू शकतात. ती गद्दारांची दाढी आहे, अफजल खानाची दाढी आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.
