अहमदनगर : केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी यांनी ‘सूरत-नाशिक-सोलापूर अहमदनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवे’ची घोषणा केली. या हायवेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात हा हायवे एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. सूरत-नाशिक-सोलापूर-अहमदनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे. या रस्त्याला पूर्ण ग्रीन अलाईन्मेंट आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत जाणार आहे. यात पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्राफिक मुंबईत येतो. मुंबईवरुन सोलापूर, कोल्हापूरवरुन तो दक्षिणेत जातो. त्यामुळे मुश्रीफसाहेब कोल्हापूरचंही ट्राफिक जाम कमी होईल, सोलापूरचाही कमी होईल आणि हा सगळा सूरतवरुन वळेल. हा रस्ता हा अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे.