सोलापूर : आज गुढी पाडवा आहे. सगळीकडे पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे पाण्यासाठी महिला आंदोलन करत आहेत. सोलापूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पाण्याच्या घागर फोडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सोलापूर शहरातील समाधान नगर भागात मागील 15 दिवसापासून पाणी नसल्याने नागरिक आंदोलन करत आहेत. या नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारा ठिय्या मांडला आहे. पालिकेत येण्याजाण्याचा रस्ता या नागरिकांनी अडवला आहे. महापालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाची पोलिसांनी दाखल घेतली आहे. पोलिसांकडून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ऐन सणासुदीला पाणी नसल्याने महिला आंदोलक आक्रमक झाल्या आहेत. घरात तांब्याभरही पाणी नाही. तर सण कसा साजरा करू? असा सवाल या महिला विचारत आहेत.