राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर बच्चू कडू यांनी आमिष घेतल्याचं सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण असा हल्लाबोल केला.
प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मतं आहेत, आमच्या उमेदवारा ९५३ मतं आहेत. याचा अर्थ असा आहे, कामं केलं नसती तर मतं मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मतं प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं. बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
अमोल मिटकरी हा मोठा माणूस आहे. त्यांनी काय आरोप केला आहे तो मोठा माणूस आहे. मी आमिष घेणारी औलाद नाही. दबावाला बळी पडणारा मी नाही. तिथे भाजपचा उमेदवार होता, त्यांनी मला समर्थन कसं दिलं ते मला माहिती नाही. त्यामुळे आमिष दाखवणं, बळी पडणं हे बच्चू कडूंची औलाद नाही. त्यांनी सिद्ध करावं, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं. हवेतले आरोप करु नयेत, हे बंद करा, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलंय.