NEET Paper Leak | सुरक्षित व्यवस्था कुठे गेली?; NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न…
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली असून NTA आणि केंद्र सरकारला कठोर सवाल विचारले आहेत. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट (UDF) यांनी दाखल केलेल्या याचिकांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली असून NTA आणि केंद्र सरकारला कठोर सवाल विचारले आहेत. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट (UDF) यांनी दाखल केलेल्या याचिकांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “जर खरंच पेपरफुटी झाली असेल, तर ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. हा केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे, तर त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा प्रश्न आहे.” तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.
यावेळी न्यायालयाने NTA आणि इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांना थेट सवाल करत विचारलं की, “तुम्ही सुरक्षित आणि मजबूत परीक्षा प्रणाली उभी करू असं सांगितलं होतं, मग वारंवार पेपर लीक आणि परीक्षा घोटाळे कसे घडत आहेत?” या प्रश्नावर डॉ. राधाकृष्णन यांनी न्यायालयाला माहिती दिली की, 2024 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीने 35 दीर्घकालीन आणि 60 अल्पकालीन शिफारसी केल्या होत्या आणि त्यापैकी बहुतांश शिफारसींची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मात्र न्यायालय या उत्तरावर पूर्णपणे समाधानी दिसलं नाही. “जर सुधारणा लागू केल्या असतील, तर अजूनही गोंधळ आणि गैरप्रकार का सुरू आहेत?” असा प्रतिप्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला. तसेच NEET परीक्षा प्रक्रियेबाबत सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाऐवजी शिक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून आता न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
