…नाहीतर ही नौटंकी बंद करा; त्र्यंबकेश्वर मंदिरातील धूप वादावर कोणी केली जळजळीत टीका? काय केली मागणी

| Updated on: May 18, 2023 | 10:09 AM

त्र्यंबकेश्वर वादामागील सत्य शोधण्यासह मस्जिदमध्ये हनुमान चालीसा पठणास परवानगी द्या, अशी मागणी महंतांनी केली आहे. त्यामुळे हा वाद मिटण्याऐवजी वाढत जात आहे.

Follow us on

नाशिक : येथील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात अन्य धर्माच्या जमावाकडून बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणात आता आखाड्यासह येथील साधू-मंहतांनी उडी घेतली आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) वादामागील सत्य शोधण्यासह मस्जिदमध्ये हनुमान चालीसा पठणास परवानगी द्या, अशी मागणी महंतांनी केली आहे. त्यामुळे हा वाद मिटण्याऐवजी वाढत जात आहे. यावरून त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लीम धर्मीय गुण्यागोविदांने राहतात, आजवरच्या इतिहासात असा वाद कधीच निर्माण झाला नव्हता अशी नाराजी नगर वासियांसह शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनी व्यक्त केली होती. या दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या वादानंतर साधू-मंहत देखील आक्रमक झाले आहेत. मस्जिदमध्ये हनुमान चालीसा पठणास परवानगी द्या, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली आहे. तसेच त्यांनी ही मागणी जर मान्य नसेल तर ही नौटंकी बंद करा, असे खडेबोल सुनावले आहे. तर धूप वादानंतर संदलदरम्यान धूप दाखवण्याच्या प्रथेवर कुणाचा आक्षेप असेल तर ही प्रथा बंद करू, असं संदल आयोजकांनी म्हटलं होतं. मात्र आता हे प्रकरण पेटतं असल्याचेच समोर येत आहे.