राज्यावर संकटांची मालिका सुरूच आहे. आता आलेलं संकटही मोठं आहे. पण काळजी करू नका. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार आपलं आहे. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिली. सांगलीतील आर्विन पुलावर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली आहे. भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंकलखोपला आले. यावेळी त्यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. माझ्याकडे सर्व रिपोर्ट आले आहेत. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. तुमच्यावर आपत्ती ओढवली. त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे.