सकाळचा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट केल्याने आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी मिळते. नाश्ता केला नाही तर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याच कारणामुळे डॉक्टरही आपल्याला नाश्ता न टाळण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही नाश्त्यासाठी योग्य पदार्थांची निवड केली नाही तर त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान अधिक होते. काही पदार्थ आहेत जे सामान्यत: नाश्त्यासाठी खाल्ले जातात, पण त्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
अनेक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की सकाळी नाश्त्यासाठी बटाट्याची भाजी आणि तळलेली पुरी खाणं हा चांगला पर्याय ठरत नाही. कारण त्यामध्ये प्रोटीन्स नगण्य असतात आणि कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते.
प्रत्येक फळ हे हेल्दीच असेल असं नाही. बाजारात मिळणाऱ्या पॅकबंद फळांच्या रसांमध्ये पोषक तत्वं नसतात, मात्र त्यामध्ये साखर आणि प्रोसेस्ड पदार्थांचे प्रमाण अधिक असते.
जर तुम्हाला असं वाटत असेल की ब्रेड हा हेल्दी असतो, तर ती तुमची चुकीची समजूत आहे. त्यामध्ये कोणतीही पोषण मूल्य नसतात. व्हाईट ब्रेडमध्ये प्रोसेस्ड गहू असतो आणि तुम्ही जर ब्रेड-जॅम खात असाल तर त्यामध्ये अतिरिक्त साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात.
आधीपासूनच पॅक करण्यात आलेले व रेडी टू इट सीरिअल्समध्ये साखर व मीठाचे प्रमाण खूप जास्त असते. आणि हे पदार्थ ज्या धान्यापासून बनवले जातात, त्यामध्येही पोषणमूल्य नसते. त्याचप्रमाणे कॉर्नफ्लेक्समध्ये मक्याची पोषक तत्वं नगण्य असतात.