BMC Election : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागावाटप ठरलं? शिवसेना की भाजप, कोण लढवणार सर्वाधिक जागा? मोठी अपडेट समोर
Mahayuti Seat Sharing Formula for BMC Election : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. अशातच आता महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. कोणता पक्ष किती जागा लढण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊयात.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धावपळ सुरू आहे. आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून मुंबई हिसकावून घेण्याचा प्रयत्न महायुतीची असणार आहे. यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच आता बीएमसी निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबईत कुणाला किती जागा मिळणार?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप समोर आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाचे आकडे समोर आले आहेत. यानुसार भाजप 130 चे 140 जागा लढण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेनेला 80 ते 90 जागा दिल्या जाणार आहेत. तसेच 25 मुस्लिम बहुल जागांवर 10-15 जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप कोणता पक्ष किती जागा लढवणार याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
रवींद्र चव्हाण काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, ‘सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमची एक बैठक झाली होती, त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे गेलो, उर्वरित निवडणुका, त्याबाबत रणनीतीवर चर्चा झाली होती. 29 महापालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता असून त्याबद्दल चर्चा झाली. तसेच लवकरचं युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्याचं ठरलं आहे.’
पुढे बोलताना चव्हाण यांनी, काल एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी याबाबत आमची बैठक झाली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने महायुती म्हणून पुढे जाण्याची दृष्टीने जाण्याचं ठरवलं आहे. मुंबई व प्रमुख महापालिका महायुती म्हणूनच लढणार आहोत अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबईत हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे. या पक्षांना रोखण्याचे आवाहन महाविकास आघाडीसमोर असणार आहे.
