मुंबई : बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai Ahmedabad Bullet Train) मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील स्थानकाचा आराखडा, बांधकाम, तसेच 21 किलोमीटरच्या भुयारी मार्गासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमाद्वारे दिली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने या दोन्ही कामांच्या निविदा रद्द केल्या होत्या. वांद्रे-कुर्ला संकुलातून भुयारी मार्ग जाणार आहे. परंतु येथील जागा एमएमआरडीए आणि अन्य यंत्रणांकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला भुयारी मार्गाची निविदा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता स्थानक तसेच भुयारी मार्गाचा आराखडा आणि बांधकामासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्याने दिली.