Maharashtra Breaking News LIVE 11 May 2025 : पाकिस्तानी सैन्याचे 35-40 सैनिक ठार, राजीव घई यांची माहिती
भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्याचे दिसत आहे, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत आहे. केरळमध्ये २७ मे रोजी मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे. भारतातील तणावपूर्ण वातावरणामुळे सीए परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या आणि इतर ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स या ब्लॉगमध्ये मिळतील.

आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता कमी होत असल्याचं चित्र आहे. जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि जैसलमेरमधील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्यानंतर भारतानं अधिकृत पत्रकार परिषदेतून याची माहिती दिली. तर दुसरीकडे, हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी आहे. केरळमध्ये यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल. नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्यानं यंदा पाऊस वेळेवर दाखल होणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तान तणावामुळे ‘सीए’ची परीक्षा लांबणीवर गेली आहे. आयसीएआयने हा निर्णय घेतला आहे. देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने घेतला आहे. ताज्या घडामोडी, जम्मू काश्मीर तणाव, यांसह हवामानाचे अपडेट्ससाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा
LIVE NEWS & UPDATES
-
पाकिस्तानी सैन्याचे 35-40 सैनिक ठार, राजीव घई यांची माहिती
पाकिस्तानने 8 आणि 9 मे रोजी ड्रोन पाठवले. आम्ही तयार होतो त्यामुळे कोणतेही नुकसान झालं नाही. आम्ही लाहोरमधील रडार सिस्टम नष्ट केली. तसेच 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, अशी माहिती सैन्याचे अधिकारी राजीव घई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिले.
-
भारतीय सैन्याची सडेतोड कारवाई
डीजीएमओ आणि तिन्ही सैन्य दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती देण्यात आली. भारताने पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील एकूण 9 दहशतवादी तळं उद्धवस्त केली. यातील बहावलपूर आणि मुरीदके ही तळं आमच्या निशाण्यावर होती. आम्ही बहावलपूरमधील जैशचा दहशतावी तळ उद्धवस्त केला. कसाबने प्रशिक्षण घेतलेल्या मुरीदकेतील तळही उद्धस्त केला. या कारवाईत एकूण 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लाहोरमधील डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करण्यात आली. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने सर्व पाकिस्तानी ड्रोन पाडले, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
-
-
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे 100 हून अधिक दहशतवादी ठार, डीजीएमओ राजीव घई यांची माहिती
‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी होते. या काळात आम्ही 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती ऑपरेशन सिंदूरवरील पीसी दरम्यान डीजीएमओ राजीव घई यांनी दिली.
-
दहशतवाद्यांचा खात्मा हा ऑपरेशन सिंदूरचा हेतू : डीजीएमओ
“दहशतवाद्यांचा खात्मा करणं हा ‘ऑपरेशन सिंदूर’चा हेतू होता. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. भारताने दहशतवाद्यांची 9 तळं नष्ट केली. कसाबने प्रशिक्षण घेतलेल्या मुरीदकेतील तळ उद्धवस्त करण्यात आलं”, अशी माहिती डीजीएमओच्या राजीव घई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून दिली.
-
डीजीएमओ आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात
डीजीएमओ आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेतून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देण्यात येत आहे.
-
-
थोड्याच वेळात डीजीएमओंची पत्रकार परिषद, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत देणार माहिती
मोठी बातमी समोर आली आहे. थोड्याच वेळात डीजीएमओंची पत्रकार परिषद होणार आहे. डीजीएमओ या पत्रकार परिषदेतून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देणार आहेत. या पत्रकार परिषदेत सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.
-
जैसलमेरच्या भटोडा गावातील मिसाईल करण्यात आलं निष्क्रीय
जैसलमेरच्या भटोडा गावात एक मिसाईल आढळली होती.
ही मिसाईल आता सैनिकांकडून डिफ्यूज करण्यात आली आहे.
बॉम्ब डिफ्यूज पथकाने ही कामगिरी केली आहे.
-
दादाच्या नेतृत्वाखाली मला सहा खात्याचा कारभार सांभाळायला मिळतो- राज्यमंत्री इंद्रनील नाईक
– दादाच्या नेतृत्वाखाली मला सहा खात्याचा कारभार सांभाळायला मिळतात. – दादाला मी खूप आग्रह केला मला कॅबिनेट मंत्री करा, दादा म्हटले आपल्याकडे सीनियर लोक आहेत आता बरं वाटतं मला राज्यमंत्रीपद केलं सहा महत्त्वाचे खाते मला सांभाळायला येत आहे. – ईसापुर धरणावर दोन बॅरेजेस देण्यात यावं ही मराठवाड्याची आणि विदर्भाची मागणी आहे. – दादा जे बोलतात ते करतात म्हणून दादावर विश्वास आहे.
-
भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली- राजनाथ सिंह
“भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली. रावळपिंडीपर्यंत भारतीय सैन्याची धमक पोहोचली आहे,” असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
-
भारतीय हवाई दलाकडून नागरिकांना विशेष आवाहन
“ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. तोपर्यंत सर्वांनी पडताळणी न केलेली माहिती पसरवण्यापासून दूर राहावं,” असं आवाहन भारतीय हवाई दलाने केलंय.
-
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू- हवाई दल
“ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. ऑपरेशनमधील टास्क यशस्वीपणे पार पाडले. योग्यवेळी सविस्तर माहिती दिली जाईल,” असं हवाई दलाने स्पष्ट केलं.
-
कोणत्याही परिस्थितीत देश थांबणार नाही- राजनाथ सिंह
“सध्याच्या परिस्थितीत दिल्लीत उपस्थित राहणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत देश थांबणार नाही,” असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौच्या ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दोन तासांपासून बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दोन तासांपासून बैठक सुरू आहे. या बैठकीला तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित आहेत. अजित डोवालही बैठकीला उपस्थित आहेत.
-
जैसलमेरमधील भटोडा गावात जिवंत स्फोटक आढळल्याची माहिती
जैसलमेरमधील भटोडा गावात जिवंत स्फोटक आढळल्याची माहिती समोर येत आहे. जैसलमेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटक आढळलेल्या परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे.
-
पाकिस्तानला विचारा ब्रह्मोसची ताकद काय- योगी आदित्यनाथ
“ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची झलक नक्कीच पाहिली असेल. जर तुम्ही पाहिलं नसेल, तर पाकिस्तानच्या लोकांना ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या शक्तीबद्दल विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय की यापुढे होणारं कोणतंही दहशतवादाचं कृत्य युद्ध मानलं जाईल. दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना एकत्र लढावं लागेल. दहशतवाद कधीही प्रेमाची भाषा स्वीकारू शकत नाही. त्याचं उत्तर त्याच्याच भाषेत द्यावं लागेल. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
-
खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषणादरम्यान कॉलर उडवली
उदयनराजे भोसले यांनी स्पेन्काचे वाटर्सचे प्रमुख सुहास आदमाने यांची देखील कॉलर उडवून त्यांचा सन्मान केला…. असे अनेक सुहास उभे राहणे गरजेचे आहे…. जर असे सुहास उभे राहिले तर माझ्यासारख्या बेरोजगारांना संधी मिळेल…
-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड
उपसभापतीपदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड… सभापती आणि उपसभापतीपदाची निवड बिनविरोध जाहीर… सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती… या लढतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता… आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली… निवड जाहीर होताच भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला… यावेळी दिलीप माने आणि सुनील कळके समर्थकांनी मोठा जल्लोष केलाय
-
अमृतसर रेल्वे स्टेशन परिसरात शुकशुकाट
प्रवाशी रेल्वे स्टेशन परिसरात यायला तयार नाहीत… प्रवाशांना सोडणाऱ्या रिक्षा त्यांनाही मिळेना प्रवाशी… अजूनही प्रवाशांच्या मनात भीती पाहायला मिळत आहे…
-
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी काँग्रेसने मालाडमध्ये तिरंगा यात्रा आयोजित
तिरंगा यात्रेदरम्यान, लोकांनी रस्त्यावर भारतीय तिरंगा घेऊन आणि भारत माता की जय असे नारे देत भारत मातेचा झांकी काढला. काँग्रेसचे जयकांत शुक्ला म्हणाले की, ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेश वेगळा देश निर्माण केला, त्याचप्रमाणे या सरकारनेही तेच केले पाहिजे. भारताने बलुचिस्तानला एक नवीन देश बनवावे आणि जम्मू आणि काश्मीरचा जो भाग पाकिस्तानात आहे तो देखील भारताने घ्यावा.
-
तासभरापासून पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू
गेल्या तासभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा दलाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
-
काँग्रेसची तिरंगा यात्रा
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी काँग्रेसने मालाडमध्ये तिरंगा यात्रा आयोजित केली होती. या तिरंगा यात्रेदरम्यान, लोकांनी रस्त्यावर भारतीय तिरंगा घेऊन आणि भारत माता की जय असे नारे देत भारत मातेचा झांकी काढला.
-
साहिल खान याला अटक
भारत पाकिस्तान विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणारा साहिल खान याला चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली. त्याने अभद्र टिपणी केली होती. आयटीआय एक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम चांगले झाले आहे आज पुतळ्याचे अनावरण होतेय त्याच आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली.
-
भुरटिया गावात बॉम्बच तुकडे
राजस्थानमधील बाडमेरच्या भुरटिया गावात बॉम्बचे तुकडे आढळले, ड्रोन पाडण्यासाठी सैन्याने फायर केलेल्या गोळ्याचा हा भाग असण्याची शक्यता आहे. आज सकाळी सुमारे ४:३० वाजता एक जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर एक अज्ञात वस्तू रस्त्यावर कोसळली होती.
-
अमृतसर अजून पूर्वपदावर नाही
अमृतसर अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिल्यानंतर अनेक दुकान उघडली नाहीत. रस्त्यावरची वर्दळ मंदावली आहे. अजूनही अमृतसर रेड अलर्टमध्ये आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
-
पाकिस्तानने नीचपणा दाखवला
युध्दविरामानंतर सुद्धा पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानची हरकत बेमानी आहे. आमची सेना तयार आहे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच ती सरळ होत नाही त्यामुळे ती कापावी लागेल असे शिंदे म्हणाले.
-
इलेक्ट्रीक बाईकने घेतली पेट
सांगलीच्या अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर एक इलेक्ट्रीक बाईक आगीत जळून खाक झाली आहे. चालती गाडी बंद पडली त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. काही क्षणात आगीने भीषण रूप घेतले. ज्यामुळे इलेक्ट्रिक बाइक जळून खाक झाली.
-
चांदोली धरणावर मॉक ड्रिल
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणावर पोलिसांच्या वतीने मॉक ड्रिल करण्यात आले. भारत -पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाच्या वतीने चांदोली धरणावर हे मॉक ड्रिल घेण्यात आले. दहशतवाद्यांनी धरणावर हल्ला केल्यास हल्ला कसा परतवून लावायचा याबाबत मॉकड्रिल घेण्यात आले.
-
मिनी ट्रव्हल्स- ट्रकचा अपघात, 3 ठार
सातारा-लोणंद मार्गावर सालपे गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास मिनी ट्रव्हल्स आणि ट्रकचा समोरा समोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर आठ जण यामध्ये जखमी झाले आहेत. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्समधून उज्जैन येथील देवदर्शनास निघालेले असताना हा अपघात झाला आहे.
-
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा जनता दरबार
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात जनता दरबार आयोजित केला आहे. जनसामान्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी जनता दरबाराचा आयोजन केले आहे.
-
पुण्यात लेझर लाईटवर बंदी
पुण्यात लेझर लाईट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात प्रखर प्रकाश झोत असलेले बीम लाईट, लेझर बीम लाईट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिससह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पुण्यात असलेल्या लोहगाव हवाई दलाच्या तळामुळे हा निर्णय घेतला आहे.
-
टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा येत्या ११ जून रोजी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा येत्या ११ जून २०२५ पासून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राज्यातील एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
-
सहायक फौजदाराने ऑनलाईन घेतली लाच
वाळू, खडी वाहतुकीसाठी १ हजारांची लाच मागून चक्क ‘फोन-पे’ स्वीकारणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाचा सहायक फौजदार अशोक वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. हर्सुल टी पॉइंटवर ही कारवाई केली.
-
पुण्यात लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने तब्बल ३ हजार एकर जमीन महावितरणच्या ताब्यात दिली आहे. या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १३१ वीज उपकेंद्रांचे प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे आता या प्रकल्पांना गती मिळणार असून, जिल्ह्यातील ३ हजार एकर सरकारी जमिनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार आहे.
-
भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे ‘सीए’ परीक्षा पुढे ढकलल्या; आयसीएआयचा निर्णय
देशातील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ ते १४ मे दरम्यान आयोजित होणाऱ्या इंटरमिजिएट, अंतिम आणि पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर, शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबियांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्याला आणि कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसेच, शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये होणारा हा तिसरा पक्षप्रवेश मेळावा आहे. या मेळाव्यात राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि रूपाली चाकणकर यांचीही उपस्थिती असणार आहे.
-
जालन्यात पाणीटंचाई; १३७ टँकरद्वारे २८० खेपा, १० दिवसांत ३८ टँकरची वाढ
जालना जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली ही समस्या मे मध्ये अधिकच भीषण झाली असून, टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ८० गावे आणि २२ वाड्यांमधील सुमारे अडीच लाख नागरिकांसाठी १३७ टँकरद्वारे दररोज २८० खेपांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
-
अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा तब्बल १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध
पुणे: राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा तब्बल १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या शैक्षणिक वर्षापासून अकरावीसाठी राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीपर्यंत चालणारी अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट शिक्षण संचालनालयाने ठेवलं आहे.
Published On - May 11,2025 9:03 AM
