Maharashtra Breaking News LIVE 23 June 2025 : कल्याण आरटीओ क्षेत्रात शेअर रिक्षाला भाडेवाढ लागू; 3 ते 5 रुपयांनी वाढ
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 23 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागांमध्ये १६ जूनपासून शाळा सुरु झाल्या होत्या. विदर्भात २३ जूनपासून शाळा सुरु होत आहे. विदर्भात शाळेचा आज पहिलाच दिवस असल्याने शिक्षण मंत्री दादा भुसे आज बुलढाणा जिल्ह्यातील सीनगाव जहांगीर या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाणार आहे. एसटी महामंडळाकडून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजना सुरु केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच पास मिळणार आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर २५ जूनपर्यंत कायम असणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. राजापूर तालुक्यातील कोसळलेल्या यशवंत गडाची डागडुजी केली जाणार आहे. राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी ढासळलेल्या यशवंत गडाची पहाणी केली. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
वाशिम: 40 फुट खोल खदानीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील एका चाळीस फुट खोल खदानीत बेपत्ता झालेल्या जयकुमार नावाच्या युवकाचा मृतदेह आढळला आहे. पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धाडसाने आणि संयमाने हा मृतदेह बाहेर काढला.
-
वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
वाशिम जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. वाशिमच्या अनसिंग कारंजा भागात चांगला पाऊस पडला. आजच्या या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
-
नांदेड – महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष, कार्यालयावर मोर्चा
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात नांदेड जिल्ह्यातील जनता वैतागली आहे. नांदेडच्या बिलोली शहरासह तालुक्यातील जनता वीज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरली. मागील चार ते पाच महिन्यापासून नांदेडच्या बिलोली शहरासह तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभाराविरोधात बिलोली येथील नागरिकांनी मोर्चा काढत मोर्चा काढला.
-
पाकिस्तान ओआयसी व्यासपीठाचा गैरवापर करत आहे: भारत
इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताविरुद्ध केलेल्या टिप्पण्या भारताने जोरदारपणे फेटाळून लावल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तानकडून ओआयसी प्लॅटफॉर्मचा वारंवार गैरवापर केला जात आहे, ज्यामुळे दहशतवाद हे राज्य धोरण बनले आहे.
-
इराणने IAEA सोबतचे सहकार्य थांबवले
इराण आपल्या अणुकार्यक्रमावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या मनःस्थितीत आहे. अणुप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यानंतर, इराणने एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणने म्हटले आहे की ते IAEA ला सहकार्य करणार नाही. इराणने IAEA सोबतचे सहकार्य स्थगित केले आहे. इराणी संसदेच्या अध्यक्षांनी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.
-
-
जर भारताने पाणी देण्यास नकार दिला तर पाकिस्तान युद्ध करेल: बिलावल भुट्टो
सिंधू पाणी कराराअंतर्गत जर भारताने इस्लामाबादला पाणी देण्यास नकार दिला तर पाकिस्तान युद्ध करेल, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सोमवारी म्हटले.
-
पालघरमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर
पालघरच्या विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस
नदी नाल्यांना पावसामुळे पूर
मनोर विक्रमगड रस्त्यावर पाचमाड मोरी पाण्याखाली
अनेक गावांचा संपर्क तुटला
मागील तीन तासांपासून या मार्गावर वाहतूक पूर्ण ठप्प
-
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर राष्ट्रीय समाज पक्षाचा ठिय्या
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर राष्ट्रीय समाज पक्षाचा ठिय्या
सरसकट कर्जमाफी जाहीर करा यासाठी दिलं निवेदन
कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत केली घोषणाबाजी
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी
-
कल्याण, डोंबिवलीमध्ये सतत जाण्याऱ्या विजेबद्दल आमदार बालाजी संतापले; महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावलं
कल्याण, डोंबिवलीमध्ये तासंतास विज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकही हैराण आहेत. याचबाबत आता आमदार बालाजी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यांनी DPDCच्या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलचं सुनावलं आहे.
-
बोईसर तारापूर एमआयडीसी रस्त्यांची दयनीय अवस्था; तरुणांचे खड्ड्यातील पाण्यात आंघोळ करत आंदोलन
एका बाजूला बोईसर तारापूर एमआयडीसी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये निधी वर्षाकाठी खर्च करत असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र या रस्त्यांची आजही दयनीय अवस्था पहायला मिळते . बोईसर तारापूर एमआयडीसी आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून याच्या निषेधार्थ आज स्थानिक तरुणांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात आंघोळ करत एमआयडीसीचा निषेध केला आहे. बोईसर चिल्हार रस्त्यावर कित्येक फुटांचे खड्डे पडले असताना देखील एमआयडीसी याकडे दुर्लक्ष करत असल्याने एमआयडीसी बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी तरुणांकडून हे अनोख आंदोलन केलं आहे.
-
हरिभाऊ बागडे यांनी घेतलं संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन घेतलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मुक्कामी असलेल्या सासवड येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर, यावर्षी पाऊस पाणी चांगला होऊ दे, शेतकऱ्याला सुख समाधान लागू दे असं साकडं त्यांनी घातलं.
-
कल्याण आरटीओ क्षेत्रात शेअर रिक्षाला भाडेवाढ लागू; 3 ते 5 रुपयांनी वाढ
कल्याण आरटीओ क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ सह इतर ठिकाणी रिक्षा चालकांनी भाडे वाढायला सुरुवात करायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकारने ही भाडेवाढ जाहीर केली होती, मात्र रिक्षातील मीटरचं रिकॅलिब्रेशनच्या प्रतीक्षेत ती लागू नव्हती. आता 95% रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन झाल्याने शेअर रिक्षांमध्येही प्रवासाच्या अंतरानुसार 3 ते 5 रुपयांनी भाडे वाढ करण्यात आली आहे. तर या भाडेवाडीनंतर नागरिकांमध्ये व प्रवाशांमध्ये नाराजीचा सुर आहे.
-
रसायनिक खतांच्या तुटवड्यामुळे मनसेची कृषी कार्यालयावर धडक
चिपळूण तालुक्यात रसायनिक खातांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी सारवासारवीची उत्तरे दिली त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले आहेत.
-
अबू आझमीला वादंग निर्माण करण्याची सवय आहे- प्रताप सरनाईक
नुकताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली आहे. ‘या अबू आझमीला वादंग निर्माण करण्याची सवय आहे. आपली वोटबँक कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत’ असे प्रताप सरनाईक म्हणाले.
-
प्रवासी आणि पीएमपीएल बस चालक यांच्या राडा
पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापुर येथे प्रवासी आणि पीएमपीएल बस चालक यांच्या रस्त्यावर राडा झाला. पीएमपिएल चालकाने प्रवाशाला मारहाण केली आहे. या वादातुन शिक्रापुर येथे भरचौकात दोघांमध्ये चांगलीच मारहाण आणि राडा झाला.
-
इम्तियाज जलील यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांचा मोर्चा
इम्तियाज जलील यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला आहे. जलील यांनी ‘हरिजन’ शब्द वापरल्याने आंबेडकरी संघटना आक्रमण झाल्या आहेत. जलीलांना अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
-
माझा शब्द झोंबला असेल तर त्यांनी विचार करावा – संदीप देशपांडे
माझा शब्द झोंबला असेल तर त्यांनी विचार करावा. विधानभवनातील लोकांनी मराठीचा अभिमान बाळगावा – संदीप देशपांडे वक्तव्यावर ठाम.
मराठी भाषेसाठी जेलमध्येही जायला तयार असल्याचंही देशपांडे म्हणाले.
-
विधानभवनात षंढ बसलेत – मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
विधानभवनात षंढ बसलेत असं वादग्रस्त वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. विधीमंडळाच्या कार्यक्रमात मराठी भाषेत बोर्ड नसल्याने देशपांडे यांची टीका
-
गोंदिया : तुमसर शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं बैलबंडी मिरवणुकीने स्वागत.
गोंदिया : तुमसर शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं बैलबंडी मिरवणुकीने स्वागत करण्यात आलं. पहिल्या दिवशीचा खास जल्लोष होता, बैलबंडीवर नव्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
शाळेच्या नव्या सत्राची रंगतदार सुरुवात, जनजागृती गीतांनी मिरवणूक गाजली. शाळेत नव्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.
-
काहीही झालं तरी शिवसेना आणि मनसे युती होणार म्हणजे होणार – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
संदीप देशपांडे हे पद मनसेचं आणि काम भाजपचं करताहेत. भाजपने संदीप देशपांडे यांच्या पत्नीला शासकीय पद दिले आहे त्यामुळे त्याला शिवसेना मनसे एकत्र येऊ द्यायची नाही. मात्र काहीही झालं तरी शिवसेना आणि मनसे युती होणार म्हणजे होणार असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी संदीप देशपांडेंवर टीका केली आहे.
-
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा ब्रीजवरून टँकर खाली कोसळला, एकाचा मृत्यू
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा ब्रीज येथून एक टॅंकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडून खाली पडला आहे. टॅंकर पूर्णपणे बुडाला असून यात टँकरच्या ड्रायव्हरच मृत्यू झाला.
हा टँकर वसईहून ठाण्याकडे जात होता. गुजरातहून मुंबईकडे जाणा-या लेन वर ही घटना घडली. टॅंकरने प्रथम लाकडाने भरलेल्या टेलरला मागून धडक दिली होती. आणि त्यानंतर ड्रायव्हरने स्टेअरिंग वळवल्यामुळे टॅंकर खाडीत कोसळला,असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
-
पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत स्थगित
एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार असल्याने पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे-सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग, इतर विमानांची तपासणी केली जाणार आहे.
-
मी चौकशीसाठी तयार
धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे प्रकरण सध्या गाजत आहे. माझ्या ओबीसी प्रमाणपत्राबाबत कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया ओंबासे यांनी दिली आहे.
-
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीची होणार उद्या मतमोजणी
बारामती मधील प्रशासकीय भवन येथील अभियांत्रिकी भवन येथे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय भवन येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. उद्या सकाळपासून होणार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 90 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
-
पालघरमध्ये पावसाची संततधार
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असून अधून मधून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे ठीक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नद्याही प्रवाहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर जास्त पाऊस असल्यामुळे शेतकर्यांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.
-
अंबादास दानवे यांचे बँकांविरोधात आंदोलन
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकर्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने बँकांना जाब विचारणार आहेत. शिवसेनेचे आज छत्रपती संभाजीनगर बरोबरच मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. अंबादास दानवे बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल ऑफिसमध्ये पोहचले आहेत. पेरणीचे दिवस असल्याने शेकऱ्यांना येत आहेत पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी त्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे.
-
मराठी पण नष्ट करण्याचा प्रयत्न -संजय राऊत
महाराष्ट्र वरती हिंदीची सक्ती हा एक महाराष्ट्राला महाराष्ट्र वरचा मराठी पण नष्ट करण्याचा आहे हिंदीची सक्ती गुजरातला नाही किंबहुना अनेक वर्षांपूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या गुजराती जनतेला विचारला आहे तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का मोदींची वक्तव्य आहे का मग देवेंद्र फडणवीस हिंदीची सक्ती महाराष्ट्रावर का लादत आहेत, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला
-
धाराशिव येथे अपघात
ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने (छोटा हत्ती) लहान टेम्पोचा अपघात. ताबा सुटल्याने टेम्पो रोडच्या खाली जावून झाला पलटी. अपघातामध्ये एका 65 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यु तर तिघेजण गंभीर जखमी. जखमींना भूम येथे रुग्णालयात हालवले. भूम शहरापासुन अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या तांबेवाडी चौकाजवळ झाला अपघात.
-
वांद्रा पूर्वेला रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी शिवसेना मैदानात
बीकेसीत काम करणाऱ्या चाकरमान्यांना चालकांच्या मुजोरीला जावं लागत होतं सामोरं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आशिष शेलार आणि शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची टीम ग्राऊंड झिरोवर दाखल. स्थानक परिसरात वाढलेली ट्राफिकची समस्या, रिक्षा चालकांची अरेरावी आणि प्रवाशांचे भाडे नकारण्याच्या संबंधित तक्रारीबाबत पोलीस मित्र ग्रुप सोमवार ते शुक्रवार तैनात. प्रवाशांच्या समस्या समजून घेत संबंधित प्रशासनासोबत समन्वय साधण्यासाठी शिवसेना वॉलेंटियर्स तैनात.
-
चार राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
चार राज्यातील 5 जागांसाठी झाली होती पोटनिवडणूक. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात. पंजाबमधील लुधियाना वेस्ट, पश्चिम बंगालमधील कालिगंज, गुजरातमधील विसावदर आणि कडी तसेच केरळमधील निलांबूर या जागांचा समावेश.
-
पुणे-सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित
पुणे-सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित. एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी. पुणे-सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग, इतर विमानांची तपासणी केली जाणार.
-
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी, पोलिसांचा चोख बंदोबस्त
बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरातील अभियांत्रिकी भवन येथे उद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय भवन येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून, एकूण 90 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यामधून 21 उमेदवार माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी निवडून येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत 88.50% विक्रमी मतदान झाले असून, ही निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यातील प्रमुख लढतीमुळे अत्यंत अटीतटीची मानली जात आहे. निकालाकडे आता संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
ऐन पावसाळ्यात पुन्हा एकदा कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
-
वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद, 8 नव्या फेऱ्या सुरु
मुंबईतील मेट्रो प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः घाटकोपर मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (MMOPL) प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.या मार्गावर अतिरिक्त आठ फेऱ्या नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत.
-
पुण्यात शिवसेना आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर
पुण्यात सध्या दोन्ही शिवसेना गटांमध्ये पोस्टर वॉर रंगलं आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील भाषणानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे बॅनर लावले होते. या बॅनरला आज ठाकरे गटाने अलका टॉकीज चौकात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाने लावलेल्या नवीन बॅनरवर, “निष्ठेचे सोडून विचार सत्तेसाठी एक लाचार” असा थेट संदेश लिहित शिंदे गटावर निशाणा साधला आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत असताना भूषवलेल्या विविध पदांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यात सुरू असलेल्या या पोस्टर युद्धामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
-
पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याने क्रूडच्या दरवाढीची शक्यता
पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याने क्रूडच्या दरवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिका-इराण संघर्ष उफाळल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव सोमवारच्या सेन्सेक्स व्यवहारावर दिसण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर, इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला बंद करण्याचा इशारा दिला. परिणामी जगातील सुमारे २०% कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.
-
‘जानकी V/S स्टेट ऑफ केरळ’ या मल्याळम चित्रपटाच्या प्रदर्शनास प्रतिबंधावरून वाद
केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) ‘जानकी V/S स्टेट ऑफ केरळ’ या मल्याळम चित्रपटाच्या प्रदर्शनास प्रतिबंध घातला आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ही कारवाई मुख्य पात्राच्या नावावरून — ‘जानकी’ — जी देवी सीतेचे एक पर्यायी नाव मानले जाते, यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटात केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविन नारायणन यांनी केले असून तो २७ जूनला प्रदर्शित होणार होता.
-
इंडिगो पायलटचा आरोप, जातीवाचक शिवीगाळ अन् अपमान झाल्याचा आरोप
गुरुग्राम इंडिगो एअरलाइन्सच्या तिघा अधिकाऱ्यांविरुद्ध एका प्रशिक्षणार्थी पायलटने जातीवरून आधारित अपमान आणि छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल आला असून गुरुग्राममधील कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात ही घटना घडली आहे. ही तक्रार आधी बंगळुरूमध्ये ‘झिरो एफआयआर’ म्हणून दाखल झाली होती, पण नंतर ती गुन्हा तपासासाठी गुरुग्रामच्या डिएलएफ-1 पोलीस स्टेशनकडे पाठवण्यात आली. इंडिगो एअरलाइन्सकडून या एफआयआरबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तक्रारदार हा ३५ वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलट असून तो बंगळुरूमधील आहे.
-
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून अतिरिक्त आठ फेऱ्या प्रवासी सेवेत दाखल
मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर सध्या हजारो प्रवाशांची गर्दी जमली आहे. १११ कोटी प्रवासी संख्या गाठलेल्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गिकेचा प्रवास आणखी सुकर झाला आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने अतिरिक्त आठ फेऱ्या प्रवासी सेवेत दाखल केल्या आहेत. त्यानुसार आता दररोज वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोच्या ४५२ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. पीक अवर्स’ला दर ३ मिनिटे २० सेकंदांनी मेट्रो धावत आहे.
-
‘अनुपमा’ या मालिकेच्या सेटवर लागलेली भीषण आग आटोक्यात
मुंबईतील फिल्म सिटीमध्ये ‘अनुपमा’ या मालिकेच्या सेटवर लागलेली भीषण आग सध्या आटोक्यात आली आहे. परंतु कूलिंगचे काम अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग सकाळी ६ वाजताच्या सुमारास लागली होती. घटनेच्या वेळी स्टुडिओमध्ये कोणताही कलाकार उपस्थित नव्हता, त्यामुळे कोणीही जखमी झालं नाही. पण या आगीत संपूर्ण स्टुडिओ जळून राख झालं आहे. आग जवळच्या स्टुडिओलाही लागली पण त्याचा फक्त एक छोटासा भाग जळाला आहे.
-
मराठीचं हिंदीकरण होत असल्याचा मनसेचा आरोप
महाराष्ट्रात शालेय पाठ्यक्रमात पहिलीपासून हिंदी ही तृतीय भाषा असणार आहे आणि यालाच आता मनसेने विरोध केला आहे. राज्यामध्ये मराठीचं हिंदीकरण होत असल्याचा आरोप करत आज मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आलं आहे.
-
तुकाराम महाराजांची पालखी यवतकडे
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी रात्री लोणी काळभोरमध्ये मुक्कामी होती. दिवे घाट पार करुन पालखी लोणी काळभोरमध्ये आली होती. सोमवारी लोणी काळभोरमधून पालखी यवतला मार्गस्थ झाली.
-
छत्रपती संभाजी नगर मोर्चा
छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापही त्यांना अटक झाली नाही. यामुळे आंबेडकरी संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती समितीतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
-
सोलापूरमध्ये दोन गटात हाणामारी, सात जखमी
सोलापुरात गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. या घटनेत माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झाले. परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
-
गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग
गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एका मालिकेच्या सेटवर आग लागली. ही आग रात्री लागली पण ती विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
Published On - Jun 23,2025 8:22 AM
