माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याचपाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेली सूचना मान्य करत पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत. यामध्ये इथून पुढे परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पोलिसांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या.
राज्यात कुठून परप्रांतीय येतात, कुठे जातात, कुठे राहतात, याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे पर्यायाने राज्य सरकारकडे असली पाहिजे, असं वारंवार राज ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून सांगत असतात. राज ठाकरेंची हीच सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे.