मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सरकारी जाहिरातीवरून हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारची सुरू असलेली जाहिरातबाजी तारतम्य सोडून तर आहेच पण जनतेच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी असल्याची टीकाही केली आहे.