Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान आज आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान आज आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी जंतरमंतर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि संपूर्ण घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
अमित ठाकरे म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून, या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरकारने न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला का?” यावेळी त्यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरही केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनंतरही सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली.
अमित ठाकरे यांनी पुढे म्हटले की, “ही घटना भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.” तसेच, दिल्लीतील हे आंदोलन देशभर पोहोचले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, या आंदोलनाच्या पुढील घडामोडींवर देशभराचे लक्ष लागले आहे.
