मुंबई : मंत्रिपदावरुन नाराज असलेले बच्चू कडू 2 दिवसांपूर्वी सरकारवर थेट अधिवेशनात कडाडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन बोलत असताना बच्चू कडूंनी मंत्रिपदाचा विषय आणला. मंत्रिपद चुलीत घाला. मंत्रिपदाची मला गरज नाही असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला. बच्चू कडूंची जी नाराजी विधानसभेत दिसली तीच नाराजी विधानसभेच्या बाहेरही पाहायला मिळाली. काल बच्चू कडू आणि अब्दुल सत्तार हे दोघेही अमरावतीच्या दौऱ्यावर होते. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याहीवेळी बच्चू कडूंनी कृषी विभागातली रिक्त पदे आणि इतर प्रलंबित मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्यांना बळ देणारा कृषी विभागच ‘ऑक्सिजन’ वर आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. प्रतिनियुक्तीमुळं अतिशय थोडे कर्मचारी कार्यालयात हजर राहतात. त्याच कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण आणि कृषीविषयक योजनांची अंमलबजावणी अशी कामं करावी लागतात. राज्यातली 80 टक्के कृषी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. अशा तक्रारींचा पाढाच बच्चू कडूंनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यापुढे मांडला.