भाजपच्या बंडखोरासोबत काँग्रेस, चंद्रपूरचा बदला भिवंडीत?
भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. भाजपमधील फुटीनंतर चौधरी नऊ नगरसेवकांसह सेक्युलर फ्रंटमध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसने चंद्रपूरमधील पराभवाचा बदला भिवंडीत घेण्याची रणनीती आखली असून, या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण घेतले आहे. भाजपने उमेदवारी घोषित केल्यानंतरही पक्षात फूट पडल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांनी आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सेक्युलर फ्रंट स्थापन केला आहे. या आघाडीकडे सध्या ५१ नगरसेवकांचे संख्याबळ असून, महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या ४६ च्या बहुमताचा आकडा त्यांनी सहज ओलांडला आहे.
या घडामोडीमुळे काँग्रेसला एकाच वेळी दोन फायदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासोबतच, त्यांचा स्वतःचा महापौरही निवडून येण्याची शक्यता बळावली आहे. भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक असून, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वाधिक ३० नगरसेवक काँग्रेसचे आहेत, तर राष्ट्रवादीचे १२ आहेत. भाजपमधून फुटलेल्या नारायण चौधरींच्या नऊ नगरसेवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने सेक्युलर फ्रंट मजबूत झाला आहे. या निमित्ताने काँग्रेसने चंद्रपूरमध्ये भाजपने साधलेल्या यशाचा वचपा भिवंडीत काढण्याची रणनीती आखल्याचे दिसते.
