मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ रुळावर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवेला पावसाचा फटका बसला आहे. येत्या 24 तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पालघर जिल्ह्यात बुधवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवार संध्याकाळपासून कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली. शहरातील अनेक भागांत पाणी साचलं. तर लोकल गाड्यांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत झालं.