Bihar Election Results : पराभव स्वीकारायला हवा, जो जिता वही सिंकदर…. फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार
देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी "जो जिता वही सिकंदर" म्हणत पराभव स्वीकारण्याचे आणि आत्मपरीक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विरोधकांवर टीका करताना, त्यांच्या अपयशामागे योजनांचा अभाव असल्याचे सांगितले. तसेच, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नागपूरमध्ये क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिरसा मुंडांना आदरांजली वाहिली. यावेळी फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर आणि शरद पवारांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. “जो जिता वही सिकंदर” असे म्हणत त्यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विरोधकांना आत्मपरीक्षण करण्यास मान्य नसल्याचा आरोप करत, त्यांच्याकडे योजना नसल्याने जनतेने त्यांना नाकारल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
काँग्रेसने आत्मपरीक्षण न केल्यास त्यांना अपयशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिला. अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवर बोलताना ती राज्याच्या मुद्द्यांवर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनतेचा महायुतीवर विश्वास असून, त्यांचाच महापौर होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
