Fadnavis in Latur : लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा डॅमेज कंट्रोल, चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतरच्या रोषावर पडदा?

| Updated on: Jan 08, 2026 | 11:04 AM

रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये सभा घेऊन विलासरावांबद्दल नितांत आदर व्यक्त केला. तसेच, चव्हाणांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असा खुलासाही केला. लातूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

रवींद्र चव्हाणांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असे वक्तव्य केल्यानंतर लातूरमध्ये मोठा राजकीय वादंग निर्माण झाला होता. या वक्तव्यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली, तसेच लातूर बंदची हाकही देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये सभा घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विलासराव देशमुखांबद्दल नितांत आदर व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना, त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील, असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काँग्रेसशी राजकीय लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आदर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या सभेत त्यांनी लातूरकरांसाठी २५९ कोटी रुपयांच्या पाणी योजनेची माहिती दिली. लातूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Published on: Jan 08, 2026 11:04 AM