पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात तसेच मोदी सरकारच्या नीतीविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेसचे नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांना घेऊन मुंबई काँग्रेसने पदयात्रेचे आयोन केले होते. या यात्रेदरम्यान भाई जगताप बोलत होते. “मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला गेलाय, असं जरी सांगितलं जात असलं तरी याला पार्श्वभूमी आहे. महागाई, वाढत्या बेरोजगारीविरोधातील हे शक्तिप्रदर्शन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत,” असे भाई गजताप म्हणाले.