डॉ. तात्याराव लहाने यांची तुफान फटकेबाजी, अजित पवार यांच्या हातात कागद गेला की…
बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी बोलताना डॉ. लहाने यांनी तुफान फटकेबाजी केली.
पुणे : अजित दादा ( AJIT PAWAR ) यांनी बारामतीला सुजलाम सुफलाम बनवलं. पण, त्यामुळे मुधुमेहाचे प्रमाण वाढलं. दरवर्षी कॅम्प घेतो तेव्हा किमान ५० ते ६० जण ज्यांचा शुगर ३५०, ४४०, ५०० आहे असे रुग्ण सापडतात. आम्ही त्यांना बरं करतो. दादांमुळे साखर मुबलक मिळत असेल तरी आपण जास्त खाऊ नये असा सल्ला प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने ( TATYARAV LAHANE ) यांनी बारामतीकरांना दिला.
सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची ड्युटी ८ तासांची असते. पण, पेशन्टला पाहून आम्ही तसेच काम करता राहतो. दररोज बारा बारा तास काम करावे लागते. अनेक ठिकाणी डॉक्टर शिबीर घेतात. पण तिथे शिस्तीचा प्रॉब्लेम येतो. बारामतीत मात्र तसं काही होत नाही. बारामतीमध्ये आलो की आम्हाला घरी आल्यासारखे वाटते. आमची सर्व काळजी घेतली जाते. बारामतीसारखा शिस्तबद्ध कॅम्प कुठेही होत नाही.
अजितदादा यांच्याकडे फक्त कागदावर लिहून काम नेलं तरी तो कागद सगळ्या मंत्रालयात फिरत असतो. प्रत्येक माणसाकडे त्यांचं लक्ष असतं. बारामतीकर नशिबवान आहेत. इथे आरोग्य कॅम्पमधील काही माणसे जे. जे.मध्ये भेटतात तेव्हा ते बारामतीहुन आलोय असं सांगतात. लोक आता आम्हाला बारामतीकर समजतात अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
