Girish Mahajan | महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?

| Updated on: May 24, 2026 | 4:49 PM

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया देत, “महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून समन्वयाने निर्णय घेतील. जागावाटपावरून कोणतीही समस्या नाही,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया देत, “महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून समन्वयाने निर्णय घेतील. जागावाटपावरून कोणतीही समस्या नाही,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा पूर्ण झाली असून प्रत्येक पक्षाने आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला आहे. “भाजपकडून आम्ही आमचा रिपोर्ट पक्ष नेतृत्वाला दिला आहे, तर शिवसेनेने त्यांचा अहवाल एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला आहे. आता तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जळगाव, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी जागावाटपावर तिढा असल्याचंही त्यांनी मान्य केलं. “प्रत्येक पक्ष आपल्या संख्याबळानुसार जागांची मागणी करत आहे. भाजपदेखील अनेक ठिकाणी दावा करत आहे. मात्र पुढील एक-दोन दिवसांत हा तिढा सुटेल,” असा दावा महाजन यांनी केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही भाष्य केलं. “शिंदे साहेब नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांचा दौरा केवळ जागावाटपासाठीच आहे असं म्हणण्याचं कारण नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार एकत्रितपणे घेतील,” असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

 

 

Published on: May 24, 2026 4:48 PM
Follow Us