Ind vs Pak : गरम सिंदूचं कोल्ड्रिंग झालं का? ठाकरेंचा हल्लाबोल, तर भाजपनं जावेद मियांदादवरून घेरलं; मॅचवरुन राजकारण तापलं
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला. त्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली. तर भाजपनं मियादादवरून ठाकरेंना घेरलंय.
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी केंद्र सरकारने टीम इंडियाला मंजुरी दिली आणि विरोधक तुटून पडले. पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर विसरले का? पंतप्रधान मोदी शरीरात गरम सिंदूर वाहतंय असं म्हणत होते. आता गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. १४ सप्टेंबरला दुबईमध्ये आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिलंय. ज्यामध्ये भारत पाकिस्तान क्रिकेटवरून सवाल उपस्थित करण्यात आले.
पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. जर संघर्ष अजूनही सुरूच असेल तर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळू शकतो? पाकिस्तानी दहशतवादी गटानी पहलगाममध्ये हल्ला केला. २६ महिलांच सिंदूर पुसलं. तुम्ही त्या माता-बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का? जर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळलो नाही तर व्यापार थांबवण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे का? तुम्ही घोषित केलं होतं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. आता रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालेल?
आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामधली चकमक जावेद मियादादवर आली. ३० जुलै २००४ ला मातोश्रीवर पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियादाद आला होता. या भेटीवर भाजपनं बोट ठेवलं. जावेद मियादादला मातोश्रीवर बिर्याणी देणाऱ्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटवर बोलण्याचा अधिकार नाही असं शेलार यांनी म्हटलंय.
