चैतन्य गायकवाड, लासलगाव नाशिक : नाशिकमधील लासलगामध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे.कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने काल तब्बल 10 तास शेतकऱ्यांनी लिलाव ठप्प केले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्याकडे सहा प्रमुख मागण्या ठेवल्या. दादा भुसे यांनी आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आज आता लिलाव सुरू झाला आहे. ठिकठिकाणाहून शेतकरी आपला कांदा घेऊन लासलगावमध्ये दाखल झाले आहेत. सकाळपासून जवळपास 15 ते 16 हजार क्विंटल कांद्याचालिलाव झाला आहे. सरासरी 500 ते 600 रुपये क्विंटल कांद्याला भाव सुरू आहे. मात्र भाव कमीच असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे.