पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यातील आपल्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण आणि भाजप विरोधातील आगामी रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती खुद्द ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच प्रादेशिक पक्षांना एकत्र करत देशात भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी स्पष्ट दिसून आलं. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी अत्यंत महत्वपूर्ण आणि सूचक असं उत्तर दिलं.
देशात काँग्रेसला वगळून भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण केला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी अत्यंत सावधगिरीने उत्तर दिलं. ‘कुणाला वगळ्याची बात नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे. त्यामुळे जो मेहनत करतोय आणि सगळ्यांसोबत येण्यासाठी तयार आहे, त्या सगळ्यांच्या सह’, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.