विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत हालचाली, अर्जुन खोतकरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. जळगावनंतर आता इतर मतदारसंघांमध्येही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. जळगावनंतर आता इतर मतदारसंघांमध्येही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते अर्जुनराव खोतकर यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. सुरुवातीला त्यांची मुलगी दर्शना खोतकर-झोल यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी खोतकर आग्रही असल्याची चर्चा होती. मात्र भेटीनंतर त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर विधान परिषदेसाठी इच्छुक असून त्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे.
“अभिमन्यू खोतकर याला तिकीट देण्याचा निर्णय हा पक्ष नेतृत्व घेईल. यासंदर्भात अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,” असं अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलं. तसेच, सुनेत्रा पवार यांच्याकडे मुलाच्या उमेदवारीसाठी कोणताही राजकीय पाठिंबा मागितलेला नसून आपण केवळ कामानिमित्त भेट घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. पुणे मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तर नाशिक व छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांवरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटतो का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
