तिसरी लाट येणार म्हणून आतापासूनच घाबरून घरात बसायचं का? असा सवाल करतानाच ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी या सरकारची अवस्था झाली आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. तिसरी लाट येणार म्हणून आपण आतापासूनच घाबरून घरामध्ये बसायचं ही कुठली पद्धत आहे. लोकांचे उद्योगधंदे बरबाद झाले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. घरं कशी चालवायची कळत नाही, मुलांच्या फी कशा भरायच्या तेही समजत नाही. यांना काय जातं लॉकडाऊन करायचा आणि यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, असा संताप राज यांनी व्यक्त केला. पी. साईनाथ यांचं पुस्तक होतं. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ तसं हे ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’, असा टोला राज यांनी लगावला.