Sharad Pawar : ही गोष्ट चांगली नाही, पैसे किती द्यायचे? यासाठी चढाओढ… निवडणुकीत वाढत्या पैशांच्या वापराबाबत पवारांकडून चिंता व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. कामावर नव्हे, तर पैसे किती द्यायचे? यावर मते मागितली जात असल्याची टीका त्यांनी केली. अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न चुकीचा असून, जनतेने याचा विचार करावा, असे आवाहन पवारांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या पैशांच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पैसे किती द्यायचे? यावर मतांची चढाओढ सुरू असून, कामावर नव्हे, तर पैशांवर मते मागितली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी अर्थकारण केले जाणे ही गोष्ट चांगली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. जनतेने या दृष्टिकोनाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक निवडणुकांमध्ये ठीक ठिकाणी गटबाजी निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकाच पक्षातील सदस्य दुसऱ्या पक्षासोबत जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले, यातून पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे संकेत मिळतात. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतदार योग्य तो निकाल देतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जवसुली संदर्भात सरकारच्या एका वर्षाच्या निर्णयावरही भाष्य केले. हा निर्णय तात्पुरता उपयुक्त ठरेल; परंतु शेतकऱ्यांची गरज भागणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करता सरकारने काही रक्कम थेट द्यायला हवी होती, तसेच काही रकमेवरील व्याज माफ करून दीर्घ हप्ते दिले असते, तर शेतकऱ्यांना अधिक मदत झाली असती. सध्या दिलेली मदत पुरेशी नसल्याचे त्यांचे मत आहे.