Ratnagiri Unseasonal Rain | कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत पावसाने दमदार आगमन केलं असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर अखेर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत पावसाने दमदार आगमन केलं असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून पुढील तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं. राजापूर, लांजा आणि संगमेश्वर परिसरात जोरदार सरी कोसळल्या. लांजा तालुक्यातील सापुचेतळे आणि खानवली भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून ग्रामीण भागातील शेतीकामांना वेग मिळण्याची शक्यता आहे.
मात्र दुसरीकडे, मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या या पावसाचा फटका हापूस आंबा उत्पादकांना बसला आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा पिकाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर अशाच स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
