मुंबई: क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर सत्ताधाऱ्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून वानखेडेंची पोलखोल केली जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही आठवले यांनी केला. रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते. वानखेडे हे एक मागासवर्गीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे, असं आठवले म्हणाले.