Sanjay Raut | एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, त्यांचे हायकमांड…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, राज्याला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असला तरी तिघांचेही ‘हायकमांड’ दिल्लीमध्येच आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, राज्याला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असला तरी तिघांचेही ‘हायकमांड’ दिल्लीमध्येच आहे. पक्षांची नावे वेगळी असली तरी राज्यातील राजकीय घडामोडी, आपापसातील वाद, तसेच विकासासंबंधी शासकीय चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख करत, या पक्षाचे निर्णय मुंबईतच घेतले जातात, असे सांगितले. मात्र, अमित शाह यांनी स्थापन केलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना त्यांच्या ‘हायकमांड’शी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जावे लागते, हे सर्वांना माहिती असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात खासदारांची बैठक घेतली असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिंदे गट आणि अजित पवार गटाचे ‘निर्माते’ असल्याचं म्हणत, त्यांना भेटणे आवश्यकच असते, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.
