पुणे: पुण्याच्या लालमहालात आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी जनतेला संबोधन केलं. “या देशात राजे अनेक होऊन गेलेत, त्यांचा इतिहास वेगळा, 350 वर्षात कुणाच्या मनात एखादा राजा कुणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. या देशात अनेकानी राज्य केले, मात्र शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य केले.सर्वसामान्य माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं. शिवाजी महाराजांनी कष्टाने, त्यागाने राज्य मिळवलं. शिवाजी महाराजांना जो काही आदर्श असेल तो आपण कृतीत आणण्याचा प्रयन्त करूया”, असं शरद पवार म्हणाले. “शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचे राज्य नव्हते, तर हिंदवी स्वराज्य होते. जनतेच्या अंतःकरणात हा राजा कायम आहे. काही घटकांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यास वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. पण या राज्यातील जनतेने पहिल्यांदा सत्तेवर बसलेल्या आपल्या राजाची भुमिका अंतःकरणापासून स्विकारली. जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारा हा नेता होता. त्याचा राज्याभिषेक सोहळा आज संपन्न होतोय”, असं शरद पवार म्हणाले.