मुंबई : राज्यात ३० जून २०२२ ला शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन बरेच महिने उलटले असले तरी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध अनेक आमदारांना लागले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सर्वांना संधी मिळणार नाही. कारण शिंदे-फडणवीस सरकार सर्व रिक्त जागा भरणार नाही. हा विस्तार छोटेखानी असणार आहे. शिंदे गटाकडून सात अन् भाजपकडून सात जणांना संधी मिळणार आहे तर या मंत्रिमंडळात केवळ १४ जणांनाच संधी देण्यात येणार आहे. तर उर्वरित लोकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ दिले जाणार आहे. रिक्त राहणारी १३ मंत्रीपदे ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात भरली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.