नाशिक: सरकार पाडण्याच्या वल्गनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा असं सांगतानाच कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून… चोची तुटून जातील. मात्र हे सरकार काही पडणार नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा टोला लगावला. डोमकावळे कितीही फडफडले तरी त्यांना काही महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार आहे. महाविकास सरकार आणण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या, त्याला यश आलं. पुलोदनंतर प्रथमच महाराष्ट्रात असा प्रयोग घडला. पुलोदचे शिल्पकार शरद पवार आपल्यासोबत आहेत. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना भक्कम पाठिंबा, असं सांगतानाच ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. अनेक वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत, असं राऊत म्हणाले.