Maharashtra Assembly : उदय सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर…. प्रकाश सुर्वे यांचा घरचा आहेर अन् विधानसभेत गदारोळ
प्रकाश सुर्वे यांनी मागाठाण्यातील घरांच्या तोडणीचा प्रश्न विधानसभेत मांडला. उदय सामंत यांनी चौकशीचे आश्वासन दिले, पण सुर्वे यांनी हे थातुरमातुर उत्तर असल्याचे म्हटले. याचवेळी भास्कर जाधव यांनी लक्षवेधी प्रश्नांच्या उत्तरांना होणाऱ्या विलंबावर संताप व्यक्त केला, ज्याला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला. विधानसभेतील कामकाज पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मागाठाणे येथील घरतोडणी आणि विधिमंडळातील लक्षवेधी प्रश्नांच्या उत्तरांना होणाऱ्या विलंबावरून जोरदार चर्चा झाली. आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईतील मागाठाण्यातील २८० घरांवर महानगरपालिका आयुक्त आणि विकासकाच्या संगनमताने कारवाई झाल्याचा आरोप केला. यावर मंत्री उदय सामंत यांनी चौकशीचे आश्वासन दिले असले तरी, सुर्वे यांनी हे थातुरमातुर उत्तर असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. यानंतर, आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे का दिली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, भास्कर जाधव यांच्या या मागणीला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला. पिजन होलमध्ये अद्याप उत्तरे आलेली नसल्याचे सामंत यांनी मान्य करत, विधानमंडळाच्या कामकाजातील दिरंगाईवर प्रकाश टाकला. मंत्र्यांनाही उत्तरे मिळत नसल्याने प्रश्न विचारणार कसे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
