गेल्या 26 दिवसांपासून राज्यात आर्यन खान आणि मुंबई ड्रग्स प्रकरण गाजत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते या प्रकरणावरुन एनसीबी आणि भाजपवर टीका करताना पाहायला मिळाले. या काळात राज्यातील मुलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून आला. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. आर्यन खान नंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा, असा खोचक टोला मेटे यांनी सरकारला लगावलाय.
‘उद्धवा… अजब तुझे सरकार’ असं म्हणत आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. बीड जिल्ह्यात केवळ दहा महिन्यातच 159 आत्महत्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली? असा सवाल मेटे यांनी केलाय. तर दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला.