Bhaskar Jadhav : लोक फुटत असताना नेत्यांना पत्ता कसा लागत नाही? भास्कर जाधवांची ‘बडव्यां’वर टीका
Bhaskar Jadhav Slams Party Management : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांवर टीका केली आहे.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षातील ‘बडव्यां’वर पक्षाच्या बैठकीत टीका केली आहे. पहिल्या फळीतील नेत्यांवर जाधव यांनी टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी मत मांडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी पक्षात डावललं जात असल्याची आपली खदखद देखील बोलून दाखवली आहे. असं असताना आता जाधव यांनी पक्षातील जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत पक्षातील ‘बडव्यां’वर टीका केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. नेतेपदाची निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना आपल्याला विचारात घेतलं गेलं नाही. ज्या भागाची जबाबदारी आहे तिथल्या गोष्टी समजल्या पाहिजे. पक्षातील आपल्या आजूबाजूचे लोक फुटत असताना आपल्या नेत्यांना पत्ता कसा लागत नाही? माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे. पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानंतर मला समजलं. हे एबी फॉर्म कोणी दिले? कसे दिले? याची कोणतीच माहिती माझ्याकडे नव्हती, असं भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे.
