मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. याच गारव्याचा अनुभव मुंबईकरांना देखिल आज मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. तर उन्हाचा तडाखा त्यानंतर आता अवकाळी पाऊस यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. तर पुढील काही दिवस पावसाच्या सरी बरसत राहतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.