Manoj Jarange: आता आश्वासन नको… आंदोलन थांबवणार की नाही?… सरकारच्या शिष्टमंडळाला भेटण्यापूर्वीच मनोज जरांगेंचा तो थेट इशारा
Manoj Jarange Hunger Strike: मराठा आरक्षणासंदर्भातील काही प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र पुन्हा पाजळले आहे. त्यानंतर मुंबईत हालचाली वाढल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार बच्चू कडू यांच्यासह सरकार अंतरवाली सराटीत हजर होईल.

Manoj Jarange and Radhakrushana Vikhe Patil: मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्या प्रलंबित असल्याच्या नाराजीने मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानंतर तातडीने काल मुंबईसह सरकार दरबारी हालचाली वाढल्या. मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार बच्चू कडू यांच्यासह सरकार अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. या घडामोडी घडत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आता आश्वासन नको असे स्पष्ट केले. त्यांनी उद्याचं आंदोलन होणार, आता थांबणार नाही असा थेट इशारा दिला.
आमरण उपोषण मागे नाही
यापूर्वी तर सांगितले होते की, १५०० गुन्हे होते. ८३४ गुन्हे मागे घेतले. आता सरकार ६४ गुन्हे मागे घ्यायचे राहिले असे म्हणत असेल तर बघू. सरकारची भूमिका ऐकून निर्णय घेणार आहे. आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्याला आम्ही सन्मान दिला. पण आश्वासन दिल्याने माझा समाज मोठा होणार आहे का? २९ ऑगस्ट ते २९ मे असा दहा महिने वेळ दिला. समाजाने सरकारला मोठा वेळ दिला. उपोषण तर फायनल आहे. यापूर्वी तीन वर्ष थांबलो. आताही दहा महिने थांबलो. दहा महिन्यांचा कालावधी हा काही थोडा वेळ नाही. केवळ वेळ आणि चालढकल होत आहे. आता 15 मेपासून मोठा वेळ मिळाला. १६ दिवस मिळाले. मी रितीच्या, कायद्याच्या बाहेर बोलत नाही. मी सर्व संकेत पाळतो. मग का माघार घ्यायची? माझ्या समाजाने का माघार घ्यायची असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
सरकार भावनाशून्य झालंय का?
उन्हात जाळून घेण्याची आम्हाला हौस आहे का? हे का साधं काम आहे का? सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हा साधासोपा विषय नाही. सरकार एसीत बसलेले आहे. ही मोठी अग्निपरीक्षा आहे. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये. याच मराठा समाजाने सरकारला सत्तेत बसवले आहे. त्यांनाच उन्हातान्हात तुम्ही होरपवळणार का? मराठा समाजाच्या मुलांसाठी, कल्याणासाठी मी हे करतोय. पण सरकारला दयामायाच नाही का, भावनाच नाही का? हे सरकार भावनाशून्य आहे का? तुम्ही कोणत्या हिंदू धर्माची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा चालवताय.गोरगरिब मराठ्यांचा तुम्ही उन्हाळा का करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
