Maharashtra, Mumbai Rains News LIVE: नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये आज ढगफुटीचा इशारा; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Maharashtra, Mumbai Rains News LIVE Updates In Marathi: आज नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट असून सोमवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूर-मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसरात मनपाच्या सुरक्षारक्षकांसह पोलीस तैनात
नाशिक – गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसरात मनपाच्या सुरक्षारक्षकांसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नदीपात्र परिसरात पाण्यात उतरण्यास पोलिसांची मनाई आहे. गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. रामकुंड, गांधी तलाव, लक्ष्मण कुंड परिसरात पाणी वाढलं आहे.
-
खडकवासला धरण आज ६२% टक्के क्षमतेनं भरलं असून कोणत्याही क्षणी विसर्ग करण्याची शक्यता
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. खडकवासला धरण आज ६२% टक्के क्षमतेनं भरलं आहे. धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण पाहता खडकवासलातून काही तासांत विसर्ग करण्याची शक्यता आहे. पर्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घेण्याचं आवाहन धरण प्रशासनाने केलं आहे.
-
-
गोरेगावातील MTNL फ्लायओव्हर ब्रिजवर पलटला अंड्यांनी भरलेला ट्रक
मुंबईच्या गोरेगावातील MTNL फ्लायओव्हर ब्रिजवर आज पहाटे सुमारे 3 वाजता अंड्यांनी भरलेला एक ट्रक पलटला होता. सध्या क्रेनच्या मदतीने पलटलेला ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, पण लाखो रुपयांची अंडी नष्ट झाली. रस्त्यावर पसरलेली लाखो रुपयांची अंडी आता हटवण्यात आली आहेत. माहितीनुसार अंड्यांनी भरलेला ट्रक जेव्हा ब्रिजवर पोहोचला, तेव्हा बाजूने एक वेगाने जाणारी गाडी गेली. त्यामुळेच ट्रकचं संतुलन बिघडलं आणि तो पलटला.
-
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील शाळांना सुट्टी
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीची तीव्रता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुट्टीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 7 जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.
-
नगर – नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनास बंदी
नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने नगर – नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनास बंदी करण्यात आली आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने निर्णय घेतला आहे. सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर बंद पर्यटकांसाठी बंद आहे. रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नाही.
-
-
खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद
मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पाऊस आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरासाठी हवामान विभागाने ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला आहे. 300 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरातील सुमारे 100 नागरिकांचं रात्री सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. तर मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
-
इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे, किल्ले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे, किल्ले आदी 48 तास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासन, वनविभाग, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा याठिकाणी बंदोबस्त राहणार आहे. पर्यटकांना या स्थळांवर मज्जाव करण्यात आला आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे.
-
-
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आज सकाळपासून सुरू
अतिवृष्टीमुळे काल दिवसभर ठप्प असलेली पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाली आहे. काही प्रमाणात नालासोपार-वसई रेल्वे ट्रॅकवर पाणी असल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत.
-
अखेर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडीचा मलबा हटवण्यात प्रशासनाला यश
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडीचा मलबा हटवण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे. रात्री १०.१० वाजता एमएसआरडीसी आणि संबंधित बांधकाम कंपनीने मलबा हटवून रस्ता सुरक्षित घोषित केला. त्यानंतर पाहणी पूर्ण झाल्यावर दोन मार्गिकांवरून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. उर्वरित दोन मार्गिकांवर अद्याप पाणी वाहत असल्याने त्या बाजूची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांनी सावधगिरीने वाहन चालवावे, लेन शिस्त पाळावी आणि महामार्ग पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-
मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम
मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे दोन विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले असून अनेक उड्डाणे विलंबाने सुरू आहेत. चेन्नईहून पुण्याकडे येणारे इंडिगोचं 6E-502 हे विमान वळविल्यानंतर सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरलं. कोलकाताहून पुण्याकडे येणारे इंडिगोचे 6E-135 हे विमान तात्पुरतं हैदराबादकडे वळविण्यात आलं आणि त्यानंतर पुण्याकडे रवाना करण्यात आलं. अकासा एअरचे एक उड्डाण परिचालन कारणास्तव रद्द करण्यात आलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतर विमानसेवा हळूहळू पूर्ववत होत असून विमानतळावरील प्रवासी सुविधांवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
-
शाळा, महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महामुंबईत काही भागांत गेल्या चोवीस तासांत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यातही वाढ झाली आहे.
-
नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे गोदावरी नदीपात्र कोरडं होतं. नाशिकसह त्रंबकेश्वरमध्ये आज ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात मुसळधार पाऊस आहे.
अतिवृष्टीमुळे काल दिवसभर ठप्प असलेली लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाली आहे. नालासोपार, वसई इथं रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात पाणी असल्याने लोकल १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे पुन्हा मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर कल्याण-डोंबिवलीत आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाले होते, शिवाय जनजीवनही विस्कळीत झालं होतं. दुसरीकडे मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे दोन विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले असून अनेक उड्डाणे विलंबाने सुरू आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Jul 07,2026 8:10 AM
