Maharashtra News LIVE : रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, मनोज जरांगे पाटील भेट देणार
अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराची नवी अपडेट, पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील देणार भेट; तसेच मुंबई आणि नाशिकमधील हवामानाचा 'यलो अलर्ट' यांसह महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी.

LIVE NEWS & UPDATES
-
रोहितळ येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक
अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा- रोहितळ ग्रामपंचायतीचे तलवाडा पोलीस स्टेशनला पत्र. रोहितळ येथील अवैध दारू विक्री अड्ड्यावर महिलांनी दाखल होत दारूच्या बाटल्यांची केली तोडफोड. लगेच कारवाई करा अशी पोलिसांकडे केली मागणी, या दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
-
अधिक मासानिमित्त बालाजी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
अधिक मासाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ऐतिहासिक बालाजी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळत आहे. अधिक मासानिमित्त मंदिर प्रशासनाकडून पहाटेपासूनच भाविकांसाठी मंदिराचे द्वार खुले केले जात असून, पहाटे साडेपाच वाजेपासून सुरू होणाऱ्या काकड आरतीला आणि विधीवत पूजेला मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. या पवित्र महिन्यात बालाजी चरणी लीन होण्यासाठी महिलांसह पुरुष भाविक पहाटेपासूनच मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावत असून, संपूर्ण धरणगाव परिसर सध्या भक्तीमय वातावरणाने भारावून गेला आहे.
-
-
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १५ शस्त्र परवाने रद्द, ६८ नवीन अर्ज फेटाळले
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द केले असून, नवीन परवान्यासाठी आलेल्या ६८ जणांचे अर्ज फेटाळून लावले आहेत. परवाना रद्द झालेल्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी व शस्त्राचा गैरवापर करणाऱ्या ५ जणांचा, परवाना मिळूनही मुदतीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या २ जणांचा, तर वृद्धत्व किंवा मृत्यू झालेल्या ८ परवानाधारकांचा समावेश आहे. दरम्यान, नवीन अर्जांची छाननी करताना अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्यासाठी कोणतेही सबळ कारण नसल्याचे समोर आल्याने ६८ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
-
मुख्यमंत्री आंदोलनाबाबत गंभीर नाहीत, अजितदादांची आठवण येतेय; रोहित पवारांचा प्रशासनाला इशारा
पंढरपूर: “मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे आणि आमचे अन्नत्याग आंदोलन गांभीर्याने घेत नाहीत; ते तहसीलदारांमार्फतही संपर्क साधू शकले असते, पण बोलत नाहीत. अशा वेळी मला अजितदादांची आठवण येते, ते असते तर सर्वात आधी भेटायला आले असते,” अशा भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या. आंदोलनाचा तिसरा दिवस असून रक्तातील साखर कमी झाली तरी आपण लढत असल्याचे त्यांनी सांगितले. आज निर्णय न झाल्यास उद्या सकाळी विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरीवर आंदोलन सुरू करू आणि राज्यभर कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आज आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील, संजय राऊत, राजू शेट्टी यांच्यासह दिल्लीतील नेत्यांची हजेरी लागणार असून, टीका करणाऱ्यांना अधिवेशनात उत्तर देणार असल्याचे पवार म्हणाले.
-
नाशिक शहर व परिसरात उकाड्याने नागरिक हैराण; आज वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा आणि रात्रीचा उकाडा अद्यापही कायम असल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. दरम्यान, कुलाबा वेधशाळा आणि हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यासाठी आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, जिल्ह्यातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पावसामुळे नागरिकांना कडक उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
-
-
त्र्यंबकेश्वरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल नष्ट
नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत त्या पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. या धडक मोहिमेदरम्यान तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, परिसरात चालणाऱ्या अवैध दारू धंद्यांविरोधात प्रशासनाने उगारलेल्या या बडग्यामुळे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
-
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता
पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पुढील दोन दिवसांत नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी, तर विदर्भात काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
-
महागड्या इंधनाचा फटका, विमानांची उड्डाणे घटली; मुंबई, दिल्लीसह अनेक मार्ग प्रभावित
नागपूर: विमान इंधनाच्या (ATF) वाढत्या किमती आणि संचालन खर्चामुळे नागपूरहून चालणाऱ्या विमान सेवांवर मोठा परिणाम झाला असून कंपन्यांनी अनेक मार्गांवरील उड्डाणांमध्ये कपात केली आहे. याचा सर्वाधिक फटका नागपूर-इंदूर मार्गाला बसला असून १५ जूनपासून या मार्गावरील दैनंदिन सेवा स्थगित करण्यात आली आहे, जी १८ जूनपासून आठवड्यातून केवळ पाच दिवस (मंगळवार आणि बुधवार वगळून) चालवली जाईल. याशिवाय, नागपूर-मुंबई आणि दिल्ली या मुख्य मार्गांवरील उड्डाणेही कमी करण्यात आली असून मुंबईसाठी आता केवळ पाच दैनंदिन उड्डाणे उपलब्ध असतील. इंडिगो कंपनीने १५ जूननंतर नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला असून यादरम्यान बंगळुरू आणि हैदराबादसाठीची विमान सेवा १५ जूनपासून तर नागपूर-कोलकाता मार्गावरील बुधवारची सेवा १० जूनपासूनच स्थगित करण्यात आली आहे.
-
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, आज निर्णय न झाल्यास नामदेव पायरीवर आंदोलनाचा इशारा
पंढरपूर: कर्जत-जामखेडमधील प्रलंबित एमआयडीसीच्या (MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलनामुळे पंढरपुरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर उद्यापासून थेट विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी महाद्वार येथे आंदोलन सुरू करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज दुपारी आंदोलन स्थळी उपस्थित राहणार असल्याने या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात आज राजकीय घडामोडींसह हवामानाचा पाराही चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हर्षदजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते मंगळवारपासून प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे वंचितला पाठिंबा देण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देशमुखांवर केलेल्या कोट्यवधींच्या आरोपामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे, पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास रोहित पवार यांनी नामदेव पायरी येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे; या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील, महादेव जानकर आणि राजू शेट्टी आज भेट देणार आहेत. दरम्यान, हवामान विभागाने नाशिक, मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण पट्ट्यात उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मान्सूनची प्रगती रखडल्यामुळे राज्यात प्रचंड उकाडा वाढला असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत.
Published On - Jun 14,2026 9:07 AM
