Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा, भाजपच्याही जोर बैठका, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात घडलं काय?
Devendra Fadnavis-Amit Shah Meeting on NCP Merger: अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रपक्ष भाजपमध्ये पण चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असताना यावर मोठी खलबतं झाल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis-Amit Shah Meeting on NCP Merger: अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावं लागणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी अजितदादा आग्रही होते. 12 फेब्रुवारी रोजी त्याविषयीची घोषणा होणार असल्याचाही दावा करण्यात आला होता. आता विलीनीकरणाची चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. दरम्यान भाजपमध्ये सुद्धा याअनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिल्ली दरबारी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाजपमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचं लवकरच विलीनीकरण?
शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा या वर्षाच्या सुरूवातीपासूनच रंगली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. काही ठिकाणी तर दोन्ही पक्षांचे उमेदवार घड्याळ याच चिन्हावर लढले. तर अजितदादा पवार दोन्ही पक्षांच्या एकीसाठी प्रयत्नात होते. त्यादृष्टीने जयंत पाटील यांच्याशी चर्चाही झाल्याचा दावा करण्यात येत होता. तर 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा दादा करणार होते असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला होता.
पण अजितदादांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आणि सहकारी पक्ष भाजपने याबाबत कानावर हात ठेवले होते. अजितदादांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपल्या कानावर अशी काही चर्चा आली नसल्याचे सांगत याविषयावर बोलणे टाळले होते. तर मित्र पक्ष असल्याने विलीनीकरणाविषयी अजितदादांनी आपल्याला सांगितले असते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण आता पुन्हा या दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर दिल्लीत घडामोडी वाढल्या आहेत.
फडणवीस-शाह यांच्यात चर्चा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी मिनी मंत्रालयाच्या निकालासोबतच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या मंत्रालयात आज दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या अधिकृतपणे आज पदभार स्वीकारणार आहेत. कॅबिनेट बैठकीमध्ये त्या आज उपस्थित असतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.या सर्व घाडमोडी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयीचे संकेत देत आहेत. लवकरच दोन्ही पक्षाचं विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
