Maharashtra News Live : उद्धव ठाकरे नागपुरात दाखल; विधीमंडळाच्या कामकाजात होणार सहभागी
सध्या राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे... प्रथमच मुंबईकरांना त्यांच्या इमारतीच्या आवारातच मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. तर होर्डिंग लावून शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकास दंड ठोठावण्यात आला आहे. एवढंच नाही तर, फसवणुकींच्या प्रकरणात देखील मोठी वाढ झाली आहे... यांसरख्या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
उद्धव ठाकरे नागपुरात दाखल
उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते नागपुरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत.
-
मार्कंडेश्वर देवस्थानातील रस्ते दुहेरीकरण करण्यात यावे यासाठी गावकऱ्यांचं आंदोलन
गडचिरोली विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडेश्वर देवस्थानातील रस्ते दुहेरीकरण करण्यात यावे ही मागणी घेऊन गावकऱ्यांनी माजी आमदार आणि भाजपचे नेते देवराव होळी यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन केलं. मार्कंडेश्वर देवस्थान गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणचे रस्ते छोटे असल्यामुळे चुकीच्या नियोजन करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
-
-
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांची नाराजी दूर
सचिन पोटे याची कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘प्रचार प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी सचिन पोटे यांनी पक्षावर नाराजगी व्यक्त करत जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता सचिन पोटे यांची नाराजी अखेर दूर झाल्याचे संकेत मिळत आहेत.
-
शिराळ्यातील शिवरवाडीमध्ये बिबट्या जेरबंद
सांगलीच्या शिराळ्यातील शिवरवाडी मध्ये बिबट्या आल्याने एकच गोंधळ उडाला. शिवरवाडी मध्ये नाथ बेंद्रे यांच्या घराचे नवीन बांधकाम सुरू आहे. या घरामध्येच बिबट्याने आसरा घेतला होता. सकाळी नाथ बेंद्रे हे घरातील पाईप आणण्यासाठी गेल्याने त्यांच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांनी तत्काळ पत्र्याने नवीन घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
-
भूमिपुत्रांना पहिले प्राधान्य मिळावं यासाठी आंदोलनाचा दावा
2008 साली रेल्वे भरती प्रकरणात मनसेने आंदोलन केले होते. यामध्ये कल्याण रेल्वे पोलीस यांनी गुन्हा दाखल केला होता. आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत मराठी माणूस असेल या स्थानिक भूमिपुत्र यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे म्हणून उभे राहतो. मी उत्तर भारतीय असलो तरी माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना पहिले प्राधान्य मिळावं यासाठी रेल्वे भरती प्रकरणात आम्ही आंदोलन केले होते. मराठी माणसाच्या पाठी आम्ही नेहमी सदैव उभे असणार असे आरोपी संतोष ठाकरे आणि गणेश चौबे यांनी सांगितले.
-
-
अजित दादांच्या हस्ते वृक्षारोपण, तीन महिन्यानंतर झाडांच्या उरल्या केवळ वाळलेल्या काड्या
बीड जिल्ह्यात 7 ऑगस्ट 2025 रोजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. एकाच दिवशी जिल्ह्यात 30 लाख वृक्षांचं रोपण करण्यात आलं. अजित दादांच्या हस्ते खंडेश्वरी येथील दीपमाळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र तीन महिन्यानंतर या वृक्षांच्या केवळ वाळलेल्या काड्या उरल्या आहेत.
-
ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक
पाच वर्षांच्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कांदिवलीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते ५ वर्षांच्या मुलीवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरला काळे फासणार आहेत. शिवसेना कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात पोहोचले आहेत.
-
-
चिखलदऱ्यात काचेचा स्काय वॉक
विदर्भाच्या काश्मिरात म्हणजे चिखलदऱ्यात काचेचा स्काय वॉक तयार होतोय. स्वित्झर्लंड व चीनच्या तुलनेत जगातील सर्वात लांबीचा स्काय वॉक चिखलदऱ्यात तयार होत आहे.हरिकेन ते गोराघाट पॉईंट असा 407 मीटरचा हा स्काय वॉक असणार आहे. चिखलदऱ्यात तयार होणारा स्काय वॉक हा भारतातील पहिला आहे. त्यामुळे याच आकर्षण देखील मोठ आहे. काही महिन्यात या स्काय वॉकचे लोकार्पण होऊन स्काय वॉक पर्यटकांसाठी सुरू होणार आहे..या स्काय वॉकमुळे चिखलदऱ्यात पर्यटन देखील वाढणार आहे. पर्यटन वाढल्याने स्थानिक आदिवासींना रोजगाराचे साधन वाढणार आहे.
-
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचा निषेध
काल रात्री चारकोपमध्ये गौतमी पाटीलचा नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी म्हणाले की, कांदिवलीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि भाजप पुरस्कृत कार्यक्रमात गौतमी पाटीलला नाचवण्यात येत आहे. दिनेश साळवी यांनी भाजपवर असा निशाणा साधला आहे.
-
नाशिक – तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट वादात, नवीन एसटीपी प्लांटसाठी तीनशे झाडांची कत्तल
नाशिक – नवीन एसटीपी प्लांट साठी तीनशे झाडांची कत्तल. साधुग्राम च्या 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी शेकडो झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट तयार होणार आहेत, याच प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप आहे. तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट वादात सापडला आहे.
-
लोकलच्या दारात उभे राहणे ‘निष्काळजीपणा’ नाही – उच्च न्यायालय
मुंबई उपनगरीय लोकलमध्ये असलेल्या भयावह गर्दीच्या परिस्थितीत दारात उभे राहणं हा काही निष्काळजीपणा मानता येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला देण्यात आलेली भरपाई कायम ठेवण्याचे निर्देश देत रेल्वे प्रशासनाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला .
-
2008 मधील मनसे आंदोलनप्रकरणी आज सुनावणी, राज ठाकरे सत्र न्यायालयात दाखल
2008 मधील मनसे आंदोलनप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणी आज राज ठाकरे प्रत्यक्ष हजर आहेत. परप्रांतीयांच्या रेल्वे भरतीवरून मनसेने 2008 साली आंदोलन केलं होतं, त्याच प्रकरणात आज सुनावणी असून राज ठाकरे हे उपस्थित आहेत.
-
बीडमध्ये निकृष्ट धान्याचा पुरवठा सुरूच, माजलगावमध्ये सडलेला गहू-ज्वारी आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष
बीड जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून नागरिकांना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचा निकृष्ट दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऐन दिवाळीत बुरशी चढलेला, किडे आणि आळ्या लागलेला निकृष्ट तांदूळ आणि गहू वाटप केल्यानंतर, आता पुन्हा माजलगाव तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये सडलेला आणि बुरशी चढलेला गहू आणि ज्वारी पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. दरवेळी धान्य पुरवठा विभाग ‘धान्य बदलून देऊ’ असे आश्वासन देतो, परंतु दिवाळीतही बदलून धान्य देण्यात आले नव्हते आणि आजही तीच परिस्थिती कायम आहे. यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करण्याची मागणी नागरिक करत असून, लोकांमध्ये या प्रकारामुळे मोठा रोष पाहायला मिळत आहे.
-
धाराशिवमध्ये ५ लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला
धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांनी भरलेला १३० कोटी ७९ लाख रुपयांचा पीक विमा कंपनीच्या आक्षेपांमुळे सध्या अडकून पडला आहे. खरीप हंगामातील पीक नुकसानीसाठी घेण्यात आलेल्या एकूण ५०४ कापणी प्रयोगांपैकी २१७ प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतले आहेत. कापणी प्रयोगांमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहून मोठ्या अडचणीत आले आहेत.
-
जळगाव MIDC मध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, भीषण आग
जळगाव एमआयडीसीतील के सेक्टर येथील साई किसान ठिबक कंपनीला काल रात्री ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत ठिबकच्या नळ्या, मशिनरी आणि सर्व साहित्य जळून संपूर्ण कंपनी खाक झाली. कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास ५५ ते ६० अग्निशमन बंबांच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. मात्र, तरीही सकाळी काही ठिकाणी आग पूर्णपणे विझलेली नव्हती. धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते. या भीषण आगीची झळ शेजारच्या दोन कंपन्यांनाही बसली आहे. आग लागली तेव्हा कंपनीत काम करणारे १५ कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
-
शेतकरी अडचणीत असताना प्रस्ताव-प्रस्ताव काय करत आहात? भास्कर जाधवांचा सवाल
आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलताना राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. शेतकरी अडचणीत असताना प्रस्ताव-प्रस्ताव काय करत आहात? शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी देणार, हे स्पष्ट करा, असा सवाल त्यांनी केला. तसेच, सरकार पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. कोकणात देखील पावसामुळे भात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले असून, ही शेती उद्ध्वस्त झाली आहे, असे ते म्हणाले. याशिवाय, नुकसानीच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव कधी पाठवला गेला, याची तारीख सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.
-
नाशिकच्या पंचवटीत कारचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
नाशिकमधील पंचवटी परिसरात मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.
-
जालन्यात शेतकरी पुत्राने नायब तहसीलदारांच्या टेबलवर उधळल्या नोटा
जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयात जमिनीच्या रस्त्याच्या वादातून एका शेतकरी पुत्राने नायब तहसीलदारांच्या टेबलवर चक्क नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील श्रीहरी मात्रे आणि जनार्दन मात्रे यांचा शेत जमिनीच्या रस्त्यावरून शेजाऱ्यांशी वाद सुरु आहे. या संदर्भात त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केले आहेत. मात्र, रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी नायब तहसीलदार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी पुत्राने हे पाऊल उचलले. दरम्यान, नायब तहसीलदारांनी मात्र शेतकऱ्याचे हे आरोप फेटाळले आहेत.
-
माढ्यात वाळू माफियांनी वकिलावर जीवघेणा हल्ला, खोटा गुन्हा दाखल
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे बेकायदा वाळू उपशाची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यामुळे संतप्त झालेल्या ७ ते ८ वाळू माफियांनी ॲड. पांडुरंग तोडकर यांच्यावर लोखंडी रॉड-अँगलने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. उपचारांसाठी त्यांना पुणे येथील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हल्ला वकिलावर झालेला असतानाही, त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने माढा तालुक्यातील अकोले खुर्द आणि फुटजवळगाव येथील ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या दोन्ही गावांनी विशेष ग्रामसभा घेऊन वाळू उपसा बंदीचा ठरावही केला आहे.
-
परळी, गेवराई, बीड नंतर माजलगाव येथील स्ट्रॉंग रूमच्या परिसरात पोलीस बंदोबस्त
बीडच्या परळी येथील स्ट्रॉंग रूम परिसरात झालेल्या गोंधळानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व स्ट्रॉंग रूम परिसराचा आढावा घेऊन पोलीस बंदोबस्त दुप्पट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर परळी, गेवराई आणि बीड या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर माजलगाव येथील स्ट्रॉंग रूम परिसरात कालपासून पोलीस बंदोबस्तात दुप्पट वाढ करत तगडी सुरक्षा देण्यात आली आहे.
-
नाशिकच्या कॉलेजरोड परिसरातील एका वडापावच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग
कॉलेज रोड येथील चार ते पाच दुकान आगीत जळून खाक. बीवायके कॉलेजच्या अगदी समोर असलेल्या दुकानांना लागली आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि स्थानिकांकडून आग आटोक्यात. आगीत चार ते पाच दुकान जळून खाक,लाखो रुपयांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या वर्दळीचा परिसर म्हणून कॉलेजरोड परिसराची ओळख, गंगापूर पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू.
-
खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांची पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागणी
उमरगा शहरातील संवेदनशील मतदान केंद्र इतर ठिकाणी हलवण्याच्या केल्या सूचना. नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा शहरातील सराईत गुंडांचा बंदोबस्त करावा. 20 डिसेंबर रोजी उमरगा नगर परिषद प्रभाग ४ व प्रभाग ५ मधे पार पडणार मतदान प्रक्रिया. 20, तारखेच्या मतदानासाठी अतिसंवेदनशील बूथ इतरत्र स्थलांतरित करावे.
-
जालना मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात
जालना शहर महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये जवळपास 9 हजार 338 दुबार नावे आढळून आली असून दुबार मतदाराच्या पडताळणीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून घरोघरी बीएलओ पाठवणार असून दुबार नावे असणाऱ्या मतदारांकडून त्यांना मतदान कोणत्या प्रभागात करायचं त्याबाबत अर्ज भरून घेतला जाणार आहे. सध्या जालना शहर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये दुबार नाव असणाऱ्या मतदारांची पडताळणी सुरू आहे. महानगरपालिकेच्या वतीने 16 प्रभागातील मतदार यादीच काम पूर्ण झाल असून 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
-
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घेतली भेट
पीडब्ल्यूडी मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात संदीप देशपांडे यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेत पत्र दिलं. संदीप देशपांडे नागपूर मध्ये जाऊन त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे यांची भेट घेत कारवाई करण्यासाठी मागणी केली. संदीप देशपांडे यांनी सलग दोन दिवस कॅश बॉम्ब चे व्हिडिओ समोर आणले होते
-
नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची कल्याण मध्ये मोठी कारवाई
मुंबईत गांजा तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणातील बैलबाजार स्मशानभूमीबाहेर सापळा रचून बॅगेतून तस्करी करत आणलेला 25 किलो गांजा देखील जप्त केला. कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा नेमका कुठून आणला , मुंबईत तो कोणाला विकायचा होता, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे.
-
धुळे शहराचा जिल्ह्याचा तापमानाचा पारा घसरला..
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.6 अंशावर पोहोचला आहे. तापमान कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांंपासून सतत तापमानात घट होते आहे. वाढलेल्या थंडीचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
-
हायकोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत होर्डिंग विरोधात नागपुर महानगरपालिकेची कारवाई
24 तासांत तब्बल 2803 अवैध होर्डिंग्स हटवले आहेत. मनपा आयुक्तांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती दिली. लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक 553, तर धरमपेठमध्ये 133 होर्डिंग्स हटवली आहेत. शहरभरात अवैध राजकीय व व्यावसायिक बॅनर-पोस्टर्सवर मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्ती-संस्थेने अद्याप एफआयआर दाखल न केल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर मनपा प्रशासनाकडून अॅक्शन घेण्यात आली आहे.
-
सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअस वर…
तापमानाचा पारा घसरल्याने जनजीवनावर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधारघेत आहेत. अजून पुढील दोन दिवसात तापमानाचा पारा खाली घसरण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
आगामी पालिका निवडणुकीत यंदा प्रथमच मुंबईकरांना त्यांच्या इमारतीच्या आवारातच मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. त्यानुसार मुंबईतील 880 गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रांगणात मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, साधारणतः 1000 ते 1,200 मतदारसंख्या असलेल्या मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर होर्डिंग लावून शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकास 5 लाखांची नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरातील अवैध होर्डिंग्ज प्रकरणावर उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा नफा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 90 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना अंधेरी पूर्वेतील MIDC परिसरात उघडकीस आली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 11,2025 8:14 AM
