Kashmir Pahalgam Terror Attack LIVE :पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटली
Kashmir Pahalgam Terror Attack LIVE News and Updates in Marathi : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी दोन दिवसीय सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. भारतात येताना पीएम मोदी यांनी पाकिस्तानी एअर स्पेसचा वापर केला नाही. यामागे पीएम मोदींची सुरक्षा आणि भारताची नाराजी ही दोन कारणं आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल भीषण दहशतवादी हल्ला झाला. उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काही वर्षातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 30 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 16 लोकांची ओळख पटली असून त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पहलगाम हे काश्मीरमधील पर्यटन स्थळ आहे. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. काल दुपारी इथे मोठ्या संख्येने पर्यटक असताना हा दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या सौंदर्याला काल रक्तरंजित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ काल श्रीनगरला रवाना झाले. आज ते घटनास्थळाला भेट देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारतात परतले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा एअरवॉल फुटला, लाखो लिटर पाण्याची नासाडी
जायकवाडी येथून जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा एअरवॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. आज सकाळी अंबड रोडवरील लक्ष्मीकांत नगर परिसरात एअरवॉल फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं आहे.
-
पहलगाम अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोद, अमित शाह तेथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता गिरीश महाजनही श्रीनगरला रवाना झाले आहेत. तसेच तिथे अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
-
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कानपूर दौरा रद्द
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा कानपूर दौरा रद्द केला आहे. उद्या म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी नरेंद्र मोदी हे कानपूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र या पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. दरम्यान जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर यांनी परिसराची नाकाबंदी केली आहे तसेच सर्च ऑपरेशनही राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. त्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे सरकार काळजी घेताना दिसत आहे.
-
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटली
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटलेली पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमधील दल लेक परिसराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. दल लेक हा परिसर बोटींगसाठी आणि तेथील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पण. या हल्ल्यानंतर नेहमी गजबज असलेल्या या दल लेक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
-
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. यातील ४ आतंकवाद्यांपैकी दोन आतंकवादी हे पाकिस्तानी असल्याचे बोललं जात आहे. तर दोन आतंकवादी हे स्थानिक असल्याचे बोललं जात आहे.
-
-
संभाजी भिडेंनी वाहिली पहलगाममधील हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
सांगली – पहलगाम येथील आतंकवादी हल्ला आणि पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत संभाजी भिडे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून निवेदन देखील देण्यात आले आहे. या घटनेचा निषेध म्हणून शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पहलगाममधील झालेल्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
-
आता टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही : सुप्रिया सुळे
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. काल दिल्लीमध्ये वन नेशन इलेक्शनबाबत बैठक सुरू होती. त्या बैठकीमध्येच आम्हाला या सगळ्या घटनेची माहिती मिळाली. आम्ही सगळे खासदार तिथे होतो सगळ्यांना थोडी थोडी माहिती मिळत होती. आम्ही संध्याकाळी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांना फोन केला आणि माहिती घेतली. आम्ही पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला समजलं की पुण्यातील दोन लोकांना कदाचित गोळ्या लागल्या आहेत. खूप दुर्दैवी आपण कितीही निषेध केला तरी कमीच पडणार आहे. अत्यंत गंभीर हा विषय आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जोपर्यंत गृहमंत्रालय ऑफिशियल स्टेटमेंट देत नाही, तोपर्यंत सगळ्यांनी जबाबदारीने स्टेटमेंट दिले पाहिजेत. अजूनही अनेक लोक अनेक भागात अडकले आहेत. सगळी यंत्रणा अतिशय ऍक्टिव्हपणे मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
-
सुरक्षा यंत्रणांकडून पहलगाममधील दहशतवाद्याचं स्केच जारी
पहलगाममधील दहशतवाद्याचं स्केच जारी करण्यात आलं होतं. याच दहशवाद्याने गोळीबार करत अनेकांचा जीव घेतला. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्याचं स्केच जारी करण्यात आलं आहे.
-
पिंपळनेर गावातील 47 लोकं काश्मीरमध्ये अडकले
माढ्याच्या पिंपळनेर गावातील 47 लोकं काश्मीरमध्ये अडकले.
पिंपळनेर गावातील मधुसूदन पेटकर कुटूबिंय तसेच पिंपळनेरचे पोलीस पाटील राहुल पेटकर यांच्यासह एकूण 47 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. महामार्गही बंद असल्याने पर्यटक अडकलेत. विमानाने महाराष्ट्रात आणण्याची सरकारकडे मागणी करण्यात येत आहे.
-
NIA टीम पहलगाम मध्ये दाखल, फॉरेन्सिक टीम कडून पुरावे एकत्र करण्यास सुरूवात
NIA टीम पहलगाम मध्ये दाखल झाली असून काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी NIA कडून चित्रीकरण करण्यात येत आहे.
NIA फॉरेन्सिक टीम कडून पुरावे एकत्र करण्यास सुरुवात. हल्ल्यावेळी वाचलेल्या लोकांचेही जबाब घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कांदिवलीमध्ये भाजपचे आंदोलन
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कांदिवलीमध्ये भाजप नेते आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात उत्तर मुंबईतील भाजप सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. आमदार मनीषा चौधरी, योगेश सागर करणार दहशतवाद्यांचा निषेध. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते दहशतवाद्यांचा पुतळाही जाळणार आहेत.
-
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. या घटनेच्या काही तासांतच पाकिस्तानने त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो”, असं पाकिस्तानने स्पष्ट केलंय.
-
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही- पाकिस्तानचा दावा
पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांनी ही माहिती दिली. दहशतवादी कारवाईचे आरोप फेटाळतो आणि हल्ल्याचा निषेध करतो, असं ख्वाजा असीफ यांनी म्हटलंय. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसूरी पाकिस्तानचा असल्याची माहिती आहे.
-
Pahalgam Terror Attack : पर्यटकांसाठी जम्मू-काश्मीर स्वर्ग बनवू म्हणाले, त्यांना स्वर्गात पाठवलं- राऊत
“गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या. हे राज्यकर्ते नाहीच. हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत. संपूर्ण काश्मीरमध्ये अशांतता आहे. दहशतवादीमुक्त जम्मू-काश्मीर बनवू, असं मोदी म्हणाले होते. पर्यटकांसाठी आम्ही जम्मू-काश्मीर स्वर्ग बनवू असं मोदी म्हणाले होते, गेले लोक स्वर्गात. तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलात”, अशी टीका राऊतांनी केली.
-
Pahalgam Terror Attack : पश्चिम बंगालपासून जम्मू-काश्मीरपर्यंत धार्मिक द्वेषाने लोकांच्या हत्या- राऊत
“पश्चिम बंगालपासून जम्मू-काश्मीरपर्यंत धार्मिक द्वेषाने लोकांच्या हत्या होतायत. याला देशाचे गृहमंत्री अमित शाह सर्वस्वी जबाबदार आहेत. यात मला दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव घ्यावं लागतंय,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
-
Pahalgam Terror Attack: अमित शाह हे देशाचे सर्वांत अपयशी गृहमंत्री- संजय राऊत
“अमित शाह हे या देशाचे सर्वांत अपयशी गृहमंत्री आहेत. गुंडागर्दी करून देश चालत नाही. या देशात धार्मिक द्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना, त्याचा परिणाम आहे. तुम्ही 24 तास सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यात व्यस्त आहात. 365 दिवस तुमच्या डोक्यात लोकशाही संपवण्याची कारस्थानं शिजतात”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
-
Pahalgam Terror Attack: कालच्या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची – संजय राऊत
पहेलगाममध्ये काल झालेल्या हल्ल्यात पर्यटक मारले गेले आहे. कालच्या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. हल्ल्यावेळी घटनास्थळी एकही पोलीस नव्हता… सामान्य पर्यटांसाठी सुरक्षा नव्हती… लष्करात 2 लाख पदं रिक्त आहेत… अमित शहा गृहमंत्री म्हणून अपयशी… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Pahalgam Terror Attack: हेमंत जोशी यांच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत शोककळा
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते .त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती .त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लान केला होता. मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते . त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. हल्ल्याची बातमी समजताच रहिवाशांनी जोशी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचे स्टेटस पाहिले मात्र मेसेज पाठवला मात्र मेसेज डिलीव्हडच झाले नसल्याचे त्यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितले .
-
Maharashtra Breaking: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक… अनेक भागांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद… अनंतनाग शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद… अनंत नागमध्ये सध्या संचारबंदीप्रमाणे परिस्थिती
-
Maharashtra Breaking: जम्मू काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावती मधील 11 जण हे सुद्धा तेथे होते..
गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे सगळे जण तिथून निघाले होते… सध्या हे सगळे श्रीनगर मध्ये सुखरूप आहेत.. श्रीनगर मध्ये हॉटेल डेव्हलिप लँड या ठिकाणी थांबलेले आहे… अमरावती मधील मंगला बोडकेची फॅमिली.. छाया देशमुख फॅमिली,. निता उमेकर फॅमिली.,. चंदा लांडे फॅमिली….. सारिका चौधरी फॅमिली..
-
Pahalgam Terror Attack Updates : काश्मीर बंदची हाक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक. अनेक भागांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. अनंतनाग शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. अनंत नागमध्ये सध्या संचारबंदीप्रमाणे परिस्थिती.
-
Pahalgam Terror Attack Updates : अमरावतीमधील 11 जण थोडक्यात बचावले
जम्मू काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावतीमधील 11 जण हे सुद्धा तेथे होते. गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे सगळे जण तिथून निघाले होते. सध्या हे सगळे श्रीनगर मध्ये सुखरूप आहेत. श्रीनगरमध्ये हॉटेल डेव्हलिप लँड या ठिकाणी थांबलेले आहेत.
-
Pahalgam Terror Attack Updates : पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे, कौस्तुभ गणवोटे या दोघांचा मृत्यू झाला. आज संध्याकाळी दोघांचे पार्थिव पुण्यात आणणार.
-
Pahalgam Terror Attack Updates : वाशिम मुक्तांगण योगा मंडळाचे पर्यटक सुरक्षित
वाशिम शहरातील मुक्तांगण योगा मंडळाचे 51 सदस्य काश्मीरला 6 दिवसांसाठी फिरायला गेले होते. यामध्ये बहुतांश महिला आहेत. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास श्रीनगरला पोहोचल्यावर ट्युलिप गार्डनमध्ये होते पर्यटक. सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची सुषमा राऊत यांनी दिली माहिती.
-
Pahalgam Terror Attack Updates : जळगावची महिला पहलगाममध्ये अडकली
जळगावच्या शिव कॉलनीत राहणाऱ्या नेहा तुषार वाघुळदे या पहलगाममध्ये अडकल्या आहेत. नेहा वाघुळदे त्यांच्या मैत्रिणीच्या २५ ते ३० जणांच्या ग्रुप सोबत16 एप्रिलपासून जम्मू-काश्मीरला फिरायला गेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी ते परिसरातील जवळच्या लॉजवर थांबलेले होते. दहशतवादी आल्यानंतर सर्व पर्यटकांना सैन्य दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती. नेहा वाघुळदे यांनी त्यांचे पती तुषार वाघुळदे यांना फोन वरून ही माहिती दिली.
-
Pahalgam Terror Attack Updates : या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा – राज ठाकरे
“जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की, या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 23, 2025
-
Pahalgam Terror Attack Updates : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन मावस भावंडांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने हे तिघं मावस भावंड होते. संजय लेले हे शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेव्हणे होते. संजय लेले हे आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीतील श्री विजयश्री हाउसिंग सोसायटीमध्ये वास्तव्याला होते. प्रवीण राऊळ हे संजय लेले यांचे जवळचे मित्र होते. संजय लेले सोबत आम्ही दोघ लहानपणापासून एकत्र मैदानात क्रिकेट खेळलो आहोत. प्रवीण राऊळ यांना अश्रू अनावर झाले.
-
Pahalgam Terror Attack Updates : पीएम मोदींनी विमानतळावरच घेतली बैठक
सौदी अरेबियावरुन परतताच पीएम मोदींनी विमानतळावर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत एनएसए अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव उपस्थित होते. मोदींनी उपस्थितांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि सद्य स्थितीचा आढावा घेतला.
-
Pahalgam Terror Attack Updates : राहुल गांधींची अमित शाहंशी चर्चा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तारीक कारा यांच्याशी फोनवरुन बोलले. परिस्थिती समजून घेतली.
Spoke with HM Amit Shah, J&K CM Omar Abdullah, and J&K PCC President Tariq Karra about the horrific Pahalgam terror attack. Received an update on the situation.
The families of victims deserve justice and our fullest support.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 23, 2025
-
Pahalgam Terror Attack Updates : पीएम मोदी दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. ते आज सकाळी दिल्लीत दाखल झाले.
Prime Minister Narendra Modi lands in Delhi after cutting short his Saudi Arabia visit in view of the #PahalgamTerroristAttack in Kashmir pic.twitter.com/PzrUvr7ib5
— ANI (@ANI) April 23, 2025
Published On - Apr 23,2025 7:27 AM





