विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य सरकारला चोहोबाजूंनी घेरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते मंत्र्यांपर्यंत एकेकांवर टीका आणि आरोप करत त्यांची अक्षरशः पिसे काढली. हे सरकार आहे, पण शासन नाही. हे सरकार म्हणजे निव्वळ बदल्यांची फॅक्टरी आहे. कोरोना काळातले मृत्यू या राज्य सरकारने लपवले, असा घणाघात त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारच्या लालफितशाहीमध्ये आगप्रतिबंधक गोष्टीही अडकल्या. भंडाऱ्यात मुलांचा मृत्यू झाला. सरकारने दीड वर्ष कारवाई केली नाही. आग लागू शकते. मात्र, ती कशामुळे लागते. ते शोधून काढणार की नाही. प्रतिबंध करणार की नाही. या साऱ्यासाठी तुम्ही जबादार आहात, असे खडेबोल त्यांनी सुनावले.