गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतीय. आजही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचतंय. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर रेल्वेसेवेवर देखील पावसाचा परिणाम होतोय. आज सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचलं होतं. त्यामुळे 20 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. फक्त मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.