मुंबई : मुंबई, ठाण्यात दोन दिवसांपासून सुरु असलेली सीएनजीचा तुटवड्याची समस्या राज्य सरकारने गांभीर्यानं घ्यावी आणि नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे. मुंबई, ठाण्यातल्या पेट्रोलपंपावर रिक्शा, टेम्पो, कार आदी वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी कित्येक तास अधिक वेळ रांगेत थांबावं लागत आहे. त्यातून अनेकांचा रोजगार बुडत आहे. बहुतांश पेट्रोलपंपांवरचा सीएनजी साठा संपला आहे. जिथं साठा आहे तिथं कमी दाबानं पुरवठा होत आहे, स्वत:च्या ठाणे शहरातील ही समस्या सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सपशेल अपयशी ठरले असल्याची टीकाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.