छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर शहरात यावरून मोठा गदारोळ झाला. एमआयएमने विरोध केल्यावर काही हिंदू संघटना आणि मनसेकडून नामांतर समर्थनार्थ आंदोलने केली. त्यानंतर यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं. आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आता सुनावणी होणार असून छत्रपती संभाजीनगरसह संपुर्ण राज्याचे लक्ष हे या सुनावणीकडे लागले आहे. डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.